लोकेश राहुलला जितकी संधी द्यायची तितकी देऊन झाली आहे. आता तरी त्याच्याबात कठोर निर्णय घ्या, असेच आता निवड समिती व संघ व्यवस्थापनाला सांगावेसे वाटते. राहुल नक्की कोणाचा जावई आहे सुनील शेट्टीचा की बीसीसीआयचा, असाच आता प्रश्न निर्माण झाला आहे.
राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तब्बल 71 चेंडू खेळताना अवघ्या 20 धावा केल्या. तसेच तो ज्या पद्धतीने बाद झाला त्यावरून त्याचे टायमिंग, पाय, डोके स्थिर नसल्यानेच तो बाद झाल्याचे सहज लक्षात येते. परंतु आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटीत तरी त्याच्या जागी शुभमन गिल किंवा इशान किशन यांना संधी दिली गेली पाहीजे. ते काही पर्यटक नव्हे की प्रत्येक सामन्यासाठी त्यांना संपूर्ण भारत दर्शन घडवावे. इशान व गिल यांनी वेळोवेळी आपली कामगिरी सरस करून दाखवली आहे, तसेच आपला दर्जाही सिद्ध केला आहे. मग त्यांच्यापैकी एकाला संधी देत राहुलला बाहेरचा रस्ता का दाखवला जात नाही.
एकूणच जे लाड ऋषभ पंतचे सुरू होते, आता त्याची जागा राहुलने घेतली इतकेच. त्यामुळे राहुल नक्की कोणाचा जावई आहे, सुनील शेट्टीचा की बीसीसीआयचा असा प्रश्न निर्माण होतो. राहुलने ऑस्ट्रेलियात तसेच इंग्लंडमध्ये शतके साकारली आहेत परंतु तो इतिहास झाला. पूर्वपुण्याईवर खेळाडू निवडले जात नाहीत.
अर्थात आपल्या संघाचा इतिहास पाहिला तर याच निकषावर खेळाडूंचे संघातील स्थान कायम राखले गेले आहे. ही मालिका केवळ ऑस्ट्रेलियाची घमेंड उतरवण्यापूरती मर्यादीत राहिलेली नाही तर आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाची बनली आहे. बीसीसीआय, संघ व्यवस्थापन, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व निवड समिती राहुलबाबत काय विचार करते हे जाणून घ्यावे लागेल.
सहाय्यक प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी तर राहुलबाबत काळजीचे कारण नाही, त्याच्यासारखा फलंदाज एका मोठ्या खेळीने भरात येऊ शकतो असे पांघरुणही घातले आहे. मात्र, त्यांनाही विचारावेसे वाटते की ही ती त्याची बहुप्रतिक्षित मोठी खेळी होणार केव्हा आणि कधी. आणि तोपर्यंत आपल्या संघाने त्याचे लाडच करत राहायचे का. परफॉर्म ऑर पेरीश ही एक इंग्रजी म्हण आहे त्याप्रमाणे त्यालाही सांगितले गेले पाहिजे की, कामगिरी सिद्ध कर अन्यथा बाहेर बस.
अमित डोंगरे