रायरेश्वर येथे झालेल्या स्वराज्याच्या शपथविधी सोहळ्यापासून त्यांना साथ देणारे तानाजी मालुसरे यांचा आज स्मृतिदिन. तानाजी मालुसरे यांचा जन्म वर्ष 1626 मधे सातारा जिल्ह्यातील पाचगणी जवळील गोडवली गावात झाला.
पाचगणी आसपासच्या डोंगरदऱ्यांमधेच त्यांचे लहानपण सामावले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर ते पोलादपूर जवळील उंबरठ म्हणजेच त्यांचे आजोळी शेलारमामा यांच्या गावी गेले. शेलारमामांच्या तालमीतच ते युद्धाचे डावपेच शिकले. तानाजींनी स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता.
कोकण मोहिमेच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी संगमेश्वर काबीज केल्यानंतर तानाजी आणि पिलाजी यांना बंदोबस्तासाठी तेथेच ठेवले होते. राजांच्या अंदाजाप्रमाणे एका रात्री सुर्व्यांनी अचानक हल्ला केला पण तानाजी मालुसरेंनी मोठ्या धैर्याने सुर्व्यांनी केलेला हल्ला मोडून काढला. रायगडच्या आसपासच्या कोकणभागात काही दुष्ट प्रवृत्तींनी उच्छाद मांडला होता, तानाजी त्याच भागातील असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सुभेदार म्हणून तानाजींवर सोपविली.
त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उमरठ या गावी ते आपल्या परिवारासह स्थायिक झाले. त्यांनी उमरठ व आसपासच्या गावातील लोकांनाही स्वराज्याच्या कार्यात सहभागी करून घेतले. तानाजींचे नाव अजरामर झाले ते कोंढाणा किल्ले मोहिमेमुळे. पुरंदरच्या तहानुसार जे 33 किल्ले औरंगजेब बादशहाला द्यावे लागले त्यातील कोंढाणा एक होता. कालांतराने महाराजांनी हे किल्ले परत घेण्यास सुरुवात केली.
ण्याजवळील हा किल्ला घेण्याची जबादारी तानाजींवर महाराजांनी सोपविली. त्यावेळी तानाजींच्या मुलाचे लग्न ठरले होते. त्यावेळी घरचे लोक म्हणू लागले, रायबाचे लग्न होऊ द्या. मग मोहिमेवर जावे. पण त्यावेळी तानाजी म्हणाले, “आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे.’ 4 फेब्रुवारी 1670च्या रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचले.
त्यासाठी त्यांनी किल्ल्याच्या मागील बाजूचा अवघड द्रोणागिरीकड्याचा मार्ग निवडला. या बाजूने कुणी हल्ला करेल असे किल्लेदार उदयभान यास वाटले नाही. पण मावळे शत्रू सैन्यावर तुटून पडले. मोगलांचा किल्लेदार उदयभान हा पण लढवय्या होता. तानाजींबरोबर त्याचे समोरासमोर निकराचे युद्ध झाले. उदयभान खाली पडला. तानाजींनाही खूप खोलवर जखमा झाल्या होत्या त्यामुळे तेही धारातीर्थी पडले. त्यानंतर सूर्याजी मालुसरे आणि शेलारमामा यांनी हा किल्ला काबीज केला. महाराज कोंढाण्यावर आले.
तानाजींना वीरगती आल्याचे समजल्यावर ते म्हणाले, “गड आला; पण सिंह गेला’ तेव्हापासून कोंढाणा “सिंहगड’ म्हणून ओळखला जाऊ लागला. तानजींचे पार्थिव त्यांच्या उमरठ या गावी नेण्यात आले. तानाजींचा मुलगा रायबाचे लग्न झाल्यावर बेळगाव जवळील पारगडचे किल्लेदार म्हणून त्याची नेमणूक केली.