मुंबई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. कार आणि लक्झरी बसच्या अपघातात एका महिलेसह चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. डहाणू तालुक्यातील चारोटीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असेलल्या महालक्ष्मी मंदिराजवळ आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे.
आज पहाटे गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने लक्झरी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. यात एका महिलेचादेखील समावेश होता. तसेच लक्झरी बसचालकासह अन्य तीन प्रवाशी जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद अब्दुल कलाम सलाम हाफिज (३६), इब्राहिम दाऊद (६०), आशियाबेन कलेक्टर (५७), इस्माईल मोहम्मद देराय (४२), अशी मृतकांची नावे आहेत.
दरम्यान, स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.