नगर – गो-मातेच्या संरक्षण आणि संवर्धन चळवळीला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही गोसेवा आयोगाची स्थापना करण्यासाठी सरकार सकारात्मक असून, लवकरच या बाबतीत निर्णय घेणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. गो विज्ञान संशोधन संस्था पुणे, दादरा नगर हवेली मुक्ती संग्राम समिती आणि गो-सेवा समिती अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धेय मोरोपंत पिंगळे गो सेवा पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम विभागाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, भारतीय किसान संघाचे दादा लाड, गो विज्ञान संशोधन संस्थेचे राजेंद्र लुंकड, समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर, प्रांत संयोजक चंद्रशेखर धर्माधिकारी, संयोजक डॉ.सुनील कराड आदी या वेळी उपस्थित होते.
यंदाचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार पुण्याच्या सुयश चॅरिटेबल ट्रस्ट, द्वितीय पुरस्कार कर्नाटक राज्यातील वैद्य अजित रावळ आणि तृतीय पुरस्कार नगर जिल्ह्यातील बेलवंडी येथील दीपक नरवडे यांना प्रदान करण्यात आला. सेंद्रिय शेती पंचद्रव्य चिकित्सा, संवर्धन, संशोधन या क्षेत्रात कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील गौतम कराळे, सावित्रा कोतकर, गजानन डफळ, हरी धारगे, दीपक काळे, माणिकराव देशपांडे, वैद्य ओंकार मुळे आणि रमणीकभाई पटेल यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंत्री विखे पाटील यांनी गोमाता संवर्धन आणि संरक्षण चळवळीत योगदान देणाऱ्या सर्व पुरस्कारप्राप्त संस्था आणि व्यक्तींचे अभिनंदन करून सेंद्रीय शेतीच्या माध्यमातूनच गो मातेच्या संरक्षणाची आणि संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होईल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
या वेळी संघचालक जाधव, दादा लाड यांनीही मार्गदर्शन केले.