मुंबई – मुंबईत काल हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यभरातून हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत. तसेच, या मोर्चात भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेच मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याचं दिसून आलं होत. आणि आता हाच मुद्दा पकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सारखे शक्तिशाली नेते असताना असा मोर्चा काढावा लागणं हे दुर्देवाचं आहे’. असं देखील यावेळी राऊत म्हणाले. ते प्रसार माध्यमांशी सवांद साधत होते.
नेमकं संजय राऊत काय? म्हणाले…
राऊत म्हणाले, “कालचा मोर्चा हा कुणाविरोधात होता हे कळलंच नाही. तो भाजपचाच मोर्चा होता. मला वाटतं भाजप महाराष्ट्र युनिट आहे त्यांनी मोदींविरोधात आक्रोश मोर्चा काढला की काय असा लोकांचा गैरसमज आहे. मोर्चाचं नेतृत्व भाजपचे लोकच करत होते. फक्त कपडे बदलले होते. लोक तीच होती. मोर्चा काढून भाजपने मोठी चूक केली. कारण भाजपने हा मोर्चा मोदींच्या विरोधातच काढला होता’. असं टोला त्यांनी लगावला.
तसेच ते पुढे म्हणाले, “केंद्रात तर आठ वर्षापासून हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. शक्तीमान नेते आहेत. तरीही धर्मांतरे होत असतील. भाजप सांगतं तसं लव्ह जिहादची प्रकरणे होत असतील तर हे सरकारचं अपयश’ असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.