कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी निमित्त, प्रेरणा, गरज असे काही आवश्यक असते. मात्र, आपण स्वतःच मनावर घेऊन आरंभ करावा लागतो. नेमका दमदार, आत्मविश्वासपूर्ण आरंभ कसा करावा व त्याचा पाया मजबूत कसा असावा नेमके याच विषयी थोडेसे…
आरंभ’ होणे खूप महत्त्वाचे आहे. मग आरंभ कशाचाही असो, जीवनाचा, कामाचा, योजनेचा कशाचाही! पण एकाचा शेवट हा दुसऱ्याचा आरंभ असतो. जिथे एक दिवस संपतो तिथेच दुसरा दिवस चालू होतो. कोणा एका व्यक्तीने एक शोध लावला, दुसऱ्या व्यक्तीने त्या शोधाचा आधार घेऊन, तेथून सुुरुवात करून दुसरा शोध लावला. असे प्रत्येक बाबतीत होते. कोणी एका बिंदूपाशी येऊन थांबतो त्याच बिंदूपासून पुढे दुसरा काम सुरू करतो. ही अशी साखळी वाढतच जाते.
मनाचे अनेकविध पैलू आहेत. या लेखमालेत सर्व पैलूंबाबत चर्चा करणे मला केवळ अशक्यच आहे. येथे ज्या विषयांवर चर्चा केली गेली ती चर्चा म्हणजे केवळ त्या विषयाची तोंड ओळखच आहे. त्या प्रत्येक विषयावर खूप खोलवर जाऊन विचार करता येईल, संशोधन करता येईल, म्हणूनच वाचकांनी येथूनच सुुरुवात करून आणखी जास्त उंचीवर जाऊन विचार करावा. आपण एका इमारतीच्या दहाव्या मजल्यावर उभे आहोत. तेथे आपण आपली उंची मोजली तर ज्या फरशीवर उभे आहोत तेथूनच आपली उंची मोजायला सुरुवात करतो. आपली उंची जेवढी असेल तेवढीच भरणार आहे. येथे याच उंची मोजण्याची दुसरी बाजू अशी की आपण जमिनीपासून उंच दहाव्या मजल्यावर आहोत. म्हणजेच दहावा मजला जेवढा उंच आहे ती उंची आपल्याला आधीच मिळालेली आहे.
आपण फक्त आपल्या शरीराची उंची त्या उंचीत मिळवत असतो. वैचारिक उंचीबाबतही असेच काहीसे करता येऊ शकते. ज्या कोणी आपल्या आधी एखादा विचार करून ठेवलेला आहे, तो विचार समजून घेऊन त्यापुढे आपण आपले विचार न्यावयाचे आहेत. जो कोणी आपल्या आधी दहा मजले चढलेला आहे ती दहा मजली उंची आपल्याला त्याच्याकडून आपोआपच मिळते कारण त्याने जिथे शेवट केला तेथून आपण पुढे जाणार आहोत. आपण जेवढ्या उंचीवर पोहोचू शकतो तेथपर्यंत पोहोचूच. तो आपला शेवटाचा बिंदू असेल. हा आपला शेवटाचा बिंदू कोणाचा तरी आरंभ बिंदू असणार आहे. याचसाठी विचार मंथन होणे अपेक्षित आहे. विचार मंथन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपण आपल्या परीने त्या मंथनास गती व उंची द्यावयाची आहे. जसे आपल्या आधीच्या व्यक्तीने सकस, दर्जेदार विचार प्रदान केलेले आहेत, तसेच सकस आणि दर्जेदार विचार पुढच्यास देण्याची नैतिक जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणूनच आपण सकस व दर्जेदार विचारांचेच पुष्प आपल्या मनोदेवतेस अर्पण करावयाचे आहे. सकस विचारांचे बीज जर रुजविले तरच सकस विचारांचा वृक्ष तयार होणार आहे. हाच प्रगल्भ विचारांचा वृक्ष आणखी नवीन सकस बीज तयार करणार आहे.
निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिलेले आहे. आपल्याला जे जीवन लाभलेले आहे ते वास्तविक खूपच सुंदर आहे. पण माणसाने भौतिक सुखाच्या मागे धावत जीवनाचे काही वेगळेच समीकरण बनवून टाकले आहे. आपल्याला वेळेचे बंधन असते, काही ठराविक काम पूर्ण करायचे असते असे इतर अनेक घटक आपले मानसिक स्वास्थ्य बिघडवून टाकतात. पण क्षणभर विचार केला की तर लक्षात येईल की मानव निर्मित कृत्रिम घटकच आपले शारीरिक, मानसिक आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत असतात. यावर उपाय म्हणून आपण जर निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर..? एखादा पक्षी आपण हवेत उडताना पाहतो, तेव्हा त्याला कुठे कामाचा ताण असतो? त्याला कुठे घड्याळाच्या काट्यावर कुठेतरी पोहोचायचे असते? एखाद्या फांदीवर बसला, पाहिजे तितका वेळ बसेल नंतर उडून जाईल… असे स्वच्छंदी आयुष्य जगण्याचा आपण प्रयत्न केल्यास आपण जास्त सुखी होऊ.
आपल्याला स्वछंदी जीवन सगळेच दिवस जरी जगता आले नाही तरी चालेल. वर्षभरातले काही दिवस आपण स्वच्छंदी जीवन जगलो तरी आपल्या तनामनाला बरीच ऊर्जा मिळेल. आपण निसर्गाचा जसा एक घटक आहोत तसेच मानव जातीचाही एक घटक आहोत. त्यामुळे मानव जातीचे प्रचलित जीवन आहे त्याप्रमाणे आपल्याला जीवन जगावेच लागेल. हे जीवन जगताना आपणास ताणतणावांना सामोरे जावे लागणारच आहे. आपल्यापरीने हा ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा तसेच इतरांनाही कमी प्रमाणात ताण देण्याचाही प्रयत्न करावा. आपण जिथपर्यंत पोहोचणार आहोत, तेथून पुढे जो सुरुवात करील तोही जास्त उत्साहाने व तणावमुक्त मनाने सुरुवात करील.
आपण आपले मानसिक स्वाथ्य जपण्यासाठी एक सोपा उपाय करण्याची नितांत आवश्यकता आहे तो म्हणजे एक दिवसाचा “अंकीय उपवास’. अंकीय उपवास म्हणजेच आठवड्यातून एक दिवस समाजमाध्यमे, संगणक, इंटरनेट, भ्रमणध्वनी संचावरील विविध खेळ वगैरे आपण जे दिवसातून अनेक वेळा वापरतो, ते वापरायचे नाही. त्याऐवजी आपल्या आवडीचे इतर काही काम, खेळ, वाद्य वाजविणे असे आपल्याला जे काही आवडेल ते करण्यासाठी वेळ द्यावयाचा किंवा जी काही कामे करण्यासाठी आपल्याला वेळच मिळत नाही, जसे घर आवरणे, बाग काम करणे, अशी कामे करावीत. जी कामे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होती ती केल्यानंतरही आपल्याला मनातून बरे वाटते. एक मानसिक समाधान मिळते.
बघता बघता आपण या लेखमालेच्या शेवटाकडे कसे आलो ते कळलेच नाही. ही लेखमाला जरी आज संपणार असली तरी येथूनच कोणाची तरी सुरुवात होणार आहे. म्हणूनच हा लेखमालेचा शेवट नसून आरंभ आहे. वाचकांनी आपल्या मनोदेवतेला पुष्प समर्पित करतच राहावे. या लेखमालेच्या वाचकांनीच येथून आरंभ करून ही लेखमाला पुढे न्यावी असे मनापासून वाटते. जिथपर्यंत मी विचार करू शकलो ते सर्व या लेखमालेत व्यक्त केले आहेत. आता वाचकांनीच माझ्याही पुढे जाऊन विचार करावा आणि “मनमंदिरा’ या लेख मालिकेत व्यक्त करावेत. ही लेखमाला कोणा एकाची नसून आपल्या सर्वांची आहे. आपण आपल्या तसेच इतरांच्याही मनोदेवतेचा आदर करावा. तसेच आपल्या मनात कायम नवनवीन आरंभ बिंदू शोधावेत व नव्या उमेदीचा, नव्या उत्साहाचा, नव्या आशेचा, नव्या कामाचा आरंभ करावा. आपण सर्वांनी ह्या लेखमालेस उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! पुन्हा भेटूया अशाच काही निमित्ताने तोपर्यंत नमस्कार!
– अनिकेत भालेराव