नवी दिल्ली – मे महिन्यात भारतात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या प्रादेशिक परिषदेसाठी भारताने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना निमंत्रण दिले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांना हे निमंत्रण देण्यात आल्याच्या वृत्ताला पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. मात्र या परिषदेला उपस्थित राहण्याबाबत त्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
महिन्याभरापूर्वीच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीच्यावेळी बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या वक्तव्यावर भारतातून तीव्र नापसंती आणि संताप व्यक्त झाला होता. बिलावल भुट्टो यांचे वक्तव्य “असंस्कृत’ असल्याची टीका भारताने केली होती.
शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेसाठी चीनचे नवीन परराष्ट्र मंत्री किंग गॅंग यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. पाकिस्तान व्यतिरिक्त कझाकस्तान, किरीगीझस्तान, रशिया, ताजिकीस्तान आणि उझबेकिस्तान या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
Devaluation of Currency : चलनाच्या अवमूल्यनाच्या निषेधार्थ इराकमध्ये निदर्शने
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सर्वसमावेशक चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. “भारताबरोबर झालेल्या तीन युद्धांमधून पाकिस्तानला आपल्या अनुभवांमधून धडा मिळाला आहे. या युद्धांमधून केवळ दुःख, दारिद्रय आणि बेरोजगारीच मिळाली आहे.’ असे ते म्हणाले होते. नरेंद्र मोदी यांनी समोरासमोर बसून काश्मीरसारख्या सर्व ज्वलंत विषयांवर चर्चेची तयारी दाखवावी, असे आवाहनही शरीफ यांनी केले होते.