नवी दिल्ली – संयुक्त रा,ट्राच्या सुरक्षा परिषदेतील कायम सदस्यत्व असलेल्या ५ देशांच्या अदूरदृष्टीकोनामुळे सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना अडथळा येत असल्याची टीका परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केली आहे.
सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याच्या दीर्घकाळापासून प्रलंबित मुद्याबाबत कोणतीच हालचाल या पाच देशांच्या अदूरदृष्टीकोनामुळे होऊ शकत नसल्याचे जयशंकर म्हणाले. रायसिना डायलॉगच्या निमित्ताने आयोजित वार्तालापादरम्यान ते बोलत होते.
सुरक्षा परिषेदेतील सुधारणांची मागणीची भावना खूप तीव्र आहे. मात्र हे बदल होण्याच्या मागणीचा पाठपुरावा देखील सर्व पातळ्यांवरून होण्याची गरज आहे.
जर या बदलांमुळे कमी अधिकार मिळणार असतील, तर या बदलांना अनुकूल असाल का? असे जर ५ देशांना विचारले तर त्यांचे उत्तर काय असेल, याचा अंदाज करावा, असेही जयशंकर म्हणाले.
रशिया, ब्रिटन, चीन, फ्रान्स आणि अमेरिका हे पाच देश सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहेत आणि हे देश कोणत्याही ठोस ठरावाला नकाराधिकार वापरू शकतात.
भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, जर्मनी आणि जपान हे सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वाचे प्रबळ दावेदार आहेत. या देशांची आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्याची प्राथमिक जबाबदारी आहे.
संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेच्यावेळी ५० सदस्य होते. आता ही संख्या चौपट वाढली आहे. त्याप्रमाणात सुरक्षा परिषदेत देखील सुधारणा होणे गरजेचे आहे, याचा पुनरुच्चार जयशंकर यांनी केला.