जबलपूर – आज अनेक डाॅक्टर रुग्णांची लूट करत असल्याच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. मात्र जबलपूरमधील एक डाॅक्टर हे रुग्णांसाठी पृथ्वीवरील देवच ठरत आहेत. ते केवळ 20 रुपयांमध्ये रुग्णांवर उपचार करतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांची पद्म पुरस्कारासाठी निवड केली आहे. दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज प्रजासत्ताक दिनादिवशी शाल, श्रीफर देऊन त्यांचा सन्मान केला. डाॅ. मुनीश्वर चंद्र डाबर असे या डाॅक्टरांचे नाव आहे.
डाॅ. मुनीश्वर चंद्र डाबर हे भारतीय सैन्य दलात कॅप्टन पदावरून निवृत्त झालेले आहेत. त्यांनी त्यांचे रुग्णांना कमी दरात सेवा देण्याचे कार्य सुरुच ठेवले आहे. नि:स्वार्थ भावनेने केलेल्या सेवेचे फळ एकदिवस जरूर मिळते. महागाईच्या काळात देखील पैशाचा हव्यास न ठेवता नि:स्वार्थ भावनेने ते रुग्णांच्या सेवेत आहेत. त्यांनी संपूर्ण आयुष्य हे देशसेवेसाठी आणि रुग्णांची सेवा करण्यासाठी घालवण्याचा निश्चय केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना पद्म पुरस्कारासाठी निवडले आहे.
डाॅ. डाबर यांनी जबलपूर येथूनच एमबीबीएसची पदवी घेतली आहे. ते सांगतात की, त्यांनी 1986 मध्ये 2 रुपये फी आकारून रुग्णांची सेवा सुरु केली. त्यानंतर 1997 मध्ये 5 रुपये, 2012 साली 10 रुपये आणि आता 2023 वर्षात ते 20 रुपये फीस आकारून रुग्णांवर उपचार करतात. कधी क्लिनिकमध्ये तर कधी घरीच ते रुग्णांची सेवा करत असतात. डाॅ. डाबर यांनी नि:स्वार्थ केलेल्या सेवेमुळेच त्यांना पद्म पुरस्कार मिळणार आहे. असे पुरस्कार जीवनात उर्जा, आणि काम करण्यास प्रोत्साहन देतात, अशी भावना डाॅक्टर डाबर यांनी बोलून दाखवली आहे.
दरम्यान, सध्या जगभरात जो तो पैसे कमावण्याच्या कामात गुंतला आहे. आपल्याकडे जास्तीत जास्त पैसा कसा येईल हाच विचार प्रत्येकजण करताना दिसतात. जास्त पैस मिळविण्यासाठी अनेकदा इतरांची फसवणूकही केली जाते. हे सर्व स्वत:च्या आणि कुटुंबाच्या ऐशोआरामासाठी लोक करत असतात. मात्र डाॅ. डाबर म्हणाले की, हा मनुष्यजन्म पुन्हा नाही. तसेच आपण कमवलेली संपत्ती सोबतही घेऊन जाता येत नाही. त्यामुळे मानवसेवा हीच इश्वरसेवा माणून मी हे कार्य करतो. माणसांमध्येच देव आहे. आणि याच देवाची पूजा करावी. दुसऱ्यांचा पैसा बळकावून आपल्या मुलाबाळांसाठी कमावून ठेवतो मात्र तो त्यांना कधीच सुख देत नाही. त्यामुळे इतर डाॅक्टरांनीही रुग्णसेवा करावी, विनाकारण रुग्णांच्या असाहायतेचा फायदा घेऊन त्यांची आर्थिक लूट करू नये.