विकसित होत असलेली एक आर्थिक शक्ती म्हणून जशी जगाला आपली दखल घ्यावी लागते, तशीच एक महत्त्वाची लष्करी ताकद म्हणूनही भारताकडे पाहिले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने मिळवलेली शक्ती, साधलेली प्रगती आणि राखलेली संस्कृती या बाबी अभिमानाने जगासमोर मांडणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.
भारताने लोकशाही प्रजासत्ताकाची चौकट स्वीकारली, त्याला 73 वर्षे पूर्ण झाली. या प्रदीर्घ कालखंडात आपल्या देशाने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून प्रगतीचे अनेक टप्पे पार केले. हरितक्रांतीच्या माध्यमातून अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालेल्या आपल्या देशाने दुसरीकडे औद्योगिक प्रगतीही सुरूच ठेवली. अवजड उद्योगांपासून सॉफ्टवेअर उद्योगापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारतीयांनी चमक दाखवली. शिक्षण क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे भारतीय प्रतिभावंतांनी जगभरात मानाचे स्थान मिळविले आहे. असंख्य बड्या कंपन्यांचे सीईओ मूळ भारतीय वंशाचे आहेत.
अंतरिक्ष संशोधनाच्या क्षेत्रात आज आपण प्रगत देशांच्या पंक्तीत उभे आहोत. प्रगत देशांनी सहकार्य नाकारल्यानंतर गप्प न राहता “इस्रो’सारख्या संस्थेने जिद्दीने स्वबळावर प्रवास केला. दुसरीकडे “डीआरडीओ’सारख्या संस्थेने संरक्षण संशोधनाच्या क्षेत्रात भरारी घेतली. परिणामी, आज विकसित होत असलेली एक आर्थिक शक्ती म्हणून जशी जगाला आपली दखल घ्यावी लागते, तशीच एक महत्त्वाची लष्करी ताकद म्हणूनही भारताकडे पाहिले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने मिळवलेली शक्ती, साधलेली प्रगती आणि राखलेली संस्कृती या बाबी अभिमानाने जगासमोर मांडणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. राजधानी दिल्लीच्या राजपथावर होणारा शक्ती, प्रगती आणि संस्कृतीचा हा संगम पाहून प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने ताठ होते.
प्रजासत्ताक दिनाचे मुख्य आकर्षण असलेल्या या संचलनाची सुरुवात 1950 मध्येच झाली होती. राजपथावर सर्वप्रथम 1955 मध्ये संचलन झाले. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावला गेल्यानंतर संचलनाला सुरुवात होते. राष्ट्रपती भवनापासून इंडिया गेट आणि नंतर ऐतिहासिक लाल किल्ला असा या संचलनाचा मार्ग असतो. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या अनेक रेजिमेट्स आपापल्या खास बॅंडसमवेत या संचलनात सहभागी होतात. त्यानंतर विविध राज्यांमधील सांस्कृतिक संचिताचे दर्शन घडविणारे चित्ररथ असतात. दरवर्षी एखाद्या राष्ट्रप्रमुखाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते. पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकार्णो हे प्रमुख अतिथी होते. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आब्देल फताह अल सिसी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
मार्चपास्टबरोबरच फ्लायपास्ट हे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असते. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील वेगवेगळी विमाने आकाशात घरघरू लागतात, तेव्हा सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे लागतात. तीन रंगांची उधळण करत ही विमाने चित्तथरारक कसरती करतात. अमर जवान ज्योती हे राजपथावरील राष्ट्रीय युद्धस्मारक आहे. हुतात्मा जवानांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण केल्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिरी जाते. स्वातंत्र्य चळवळ, त्यानंतरची युद्धे तसेच शांतता मोहिमा आणि आपत्ती निवारणाच्या कार्यात देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण केल्यानंतर मान्यवर मुख्य व्यासपीठावर येतात. नंतर प्रमुख पाहुण्यांसह राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रपतींच्या अंगरक्षक घोडेस्वारांचा रुबाब पाहण्यासारखा असतो.
बीटिंग रिट्रीटची सुरुवात 1952 मध्ये झाली. त्यावेळच्या संचलनात प्रथमच ट्रॅक्टर सहभागी झाले होते. या ट्रॅक्टरमध्ये भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारे चित्ररथ होते. तसेच शांततेचा संदेश देणारे पांढऱ्या कबूतराचे चिन्हही ट्रॅक्टरवर लावण्यात आले होते. राष्ट्रपतींनी राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर राष्ट्रगीत वाजविले जाते आणि तोफखाना रेजिमेन्टकडून 21 तोफांची सलामी दिली जाते. राष्ट्रपती मंचावर विराजमान झाल्यानंतर अशोक चक्र, कीर्ती चक्र यांसारखे शौर्य पुरस्कार प्रदान केले जातात. सशस्त्र सैन्यदलातील जवानांनी गाजविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल हे सन्मान दिले जातात.
ज्यांनी बलिदान केले, त्यांच्या कुटुंबीयांना हे पुरस्कार प्रदान केले जातात. त्याच वेळी आपत्तीच्या तसेच आणीबाणीच्या वेळी कर्तव्याची जाण ठेवून लोकांना मदत करणाऱ्यांचा विशेषतः बालवीरांचा गौरव करण्यात येतो. त्यानंतर सुरू होणाऱ्या संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर आणि त्यांचे सेकंड इन कमांड करतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळविणारी मुले संचलनात सजवलेल्या वाहनावर किंवा हत्तीवर स्वार होतात. तोफखाना दलातील मोठी शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे, लष्करी वाहने, चिलखती वाहने, रणगाडे आणि अन्य आयुधांचे प्रदर्शन संचलनात केले जाते. देशाच्या संरक्षण सिद्धतेची ही झलक असते.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे रंगबिरंगी चित्ररथ आणि विविध राज्यांची सांस्कृतिक ओळख सांगणारे सांस्कृतिक कार्यक्रम. महाराष्ट्राचा चित्ररथ आणि सांस्कृतिक कार्यक्रम नेहमी लक्षवेधी ठरतात. महाराष्ट्राच्या अनेक चित्ररथांना पुरस्कारही मिळाले आहेत. त्यामुळे गतवर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्याचे वृत्त जेव्हा आले, तेव्हा सर्वांचाच हिरमोड झाला होता. महाराष्ट्राने आजवर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमापासून संतांनी दिलेल्या विवेकाच्या शिकवणुकीपर्यंत अनेक विषय चित्ररथांमध्ये अत्यंत कलात्मकतेने हाताळले.
गतवर्षीचा विषय होता “महाराष्ट्राची जैवविविधता’! चित्ररथांनाही मोठा इतिहास आहे. 1952 मध्ये पाच चित्ररथ संचलनात सहभागी झाले होते आणि ते सर्वच्या सर्व केंद्र सरकारनेच तयार केले होते. हळूहळू राज्ये या संचलनात आपापल्या चित्ररथासह सहभागी होऊ लागली. महाराष्ट्राचा चित्ररथ 1971 पासून संचलनात सहभागी होत आहे. पंढरपूरची वारी, औद्योगिक प्रगती, राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्य चळवळ आणि त्यातील महाराष्ट्राचे योगदान, महाराष्ट्रातील विविध लोककला, सण-उत्सव, इथला गणेशोत्सव, कोकणचा जगप्रसिद्ध हापूस आंबा, दहीहंडी, महिलांचा विकास, देशाची आर्थिक राजधानी, अजंठा-वेरूळची लेणी अशा विविध विषयांवरील चित्ररथ महाराष्ट्राने साकारले आणि ते गाजले.
दरवर्षी सामान्यतः 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना चित्ररथ साकारण्याची संधी मिळते. कधी-कधी ही संख्या वाढविली जाते. उदाहरणार्थ, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे असताना 25 चित्ररथांची निवड करण्यात आली होती. चित्ररथांसाठी प्रस्ताव मात्र सर्वच राज्यांकडून मागविले जातात. संरक्षण मंत्रालयाकडून राज्यांना पत्र लिहून प्रस्ताव मागविले जातात. त्यानंतर राज्यांनी प्रस्ताव, चित्ररथाची संकल्पना आणि प्रतिकृती पाठवायची असते. त्यातून संरक्षण मंत्रालयाकडून संचलनात सामील होणाऱ्या चित्ररथांची निवड केली जाते. राज्यांना पत्र मिळताच राज्याच्या कला क्षेत्रातील मान्यवर, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्यापैकी कोणीतरी विषय सुचवतात. अर्थात, प्रस्तावाला मंजुरी देणे अखेर संरक्षण मंत्रालयाच्याच अधिकारकक्षेत असते.
साहित्य, संस्कृती, चित्रपट, नृत्य, वास्तुकला, नाटक, कला अशा सर्व क्षेत्रांमधील नामवंत व्यक्तींची समिती संरक्षण मंत्रालयाकडून तयार केली जाते आणि ही समिती चित्ररथांची निवड करते. त्यासाठी निवड समितीच्या अनेक बैठका होतात. जसजशा बैठका होत जातात, तसतशी चित्ररथांची संख्या कमी-कमी होत जाते आणि अखेर संचलनात सादर होणारे चित्ररथ ठरतात. या समितीसमोर राज्यांच्या वतीने संकल्पना मांडणाऱ्या आणि साकारणाऱ्या व्यक्तींनाही बोलावले जाते आणि त्यांच्या संकल्पनेवर चर्चा होते. सामान्यतः लोकनृत्ये ही त्या-त्या प्रदेशाची ओळख असते. त्यामुळे राज्यांकडून नृत्यांची निवड चित्ररथासाठी प्रामुख्याने केली जाते. अशा मोठ्या प्रक्रियेनंतर साकारलेले चित्ररथ संचलन पाहायला आलेल्यांना भुरळ घालतात. संचलनाचा हा दिमाखदार सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही डोळ्याचे पारणे फेडणारा असेल अशी आशा करूया.
– राजीव मुळ्ये