Rishabh Pant – भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे पंतला आता डॉक्टरांच्या सल्ल्याने मॅक्स रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातून खासगी वार्डात हलवण्यात आले आहे. दरम्यान, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह भारतीय संघातील खेळाडूंनी पंतला लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे. बीसीआयकडून एक विडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
#PAKvsNZTest | नवीन वर्षाचे पहिले शतक डेव्हन कॉनवेच्या नावावर; पाकिस्तानला चांगलेच धुतले
भारतीय संघ आजपासून श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यास सुरुवात करणार आहे. त्याअगोदर, संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, भारतीय टी-२० संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि संघातील इतर खेळाडूंनी पंतला बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ३० डिसेंबरला शुक्रवारी सकाळच्या सुमारास रुरकी गावाला जात असताना पंतच्या कारला अपघात झाला होता. गाडी चालवत असताना पंतला झोप लागण्याने नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला असल्याचे समोर आले.
नवीन वर्षाची सुरुवात होणार असल्याने ऋषभ पंत त्याच्या आईला भेटण्यासाठी आपल्या मर्सिडीज कारने एकटाच गावी चालला होता. रुरकी येथे जात असताना शुक्रवारी सकाळी दिल्ली-डेहराडून राष्ट्रीय महामार्गावर त्याच्या कारला अपघात झाला. पंतच्या कारचा हा अपघात अत्यंत भीषण स्वरूपाचा होता. सुदैवाने तो या अपघातातून बचावला, मात्र त्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत. कपाळ, मनगट, गुडघा आणि पायाच्या घोट्याला दुखापत आहे. सध्या डेहरादूनच्या मॅक्स रूग्णालयात पंतवर उपचार सुरु आहेत.
बीसीसीआयने सोशल मीडियावर ऋषभ पंतसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणतात, “ऋषभ…आशा करतो की तू लवकरच बरा होईल. गेल्या एका वर्षात मी तुझ्यासोबत काम केलं आहे. यादरम्यान मी तुला भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील काही सर्वोत्तम खेळी खेळताना पाहिले आहे. जेव्हा जेव्हा संघ कठीण परिस्थितीत असतो तेव्हा संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याची क्षमता तुझ्यात आहे. त्याचप्रमाणे सध्या तुझ्या समोर कठीण परिस्थिती आहे आणि मला माहीत आहे की तू यावर लवकरच मात करशील. लवकर भेटू.”
💬 💬 You are a fighter. Get well soon 🤗 #TeamIndia wish @RishabhPant17 a speedy recovery 👍 👍 pic.twitter.com/oVgp7TliUY
— BCCI (@BCCI) January 3, 2023
सध्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी कर्णधार असलेल्या हार्दिक पंड्यासह संघातील इतर खेळाडूंनीही पंतला दुखापतीतून लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतला या दुखापतीतून सावरण्यास जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे आगमी काळात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आणि आयपीएल २०२३ या स्पर्धांना पंतला मुकावे लागणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षाच्या शेवटी एकदिवसीय विश्वचषक खेळला जाणार आहे. त्यापूर्वी पंत पूर्णपणे बरा झाल्यास भारताला मजबूत संघासोबत स्पर्धेत उतरता येईल.