मुंबई – भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या गाडीचा नुकताच भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, सध्या त्याच्यावर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आता पर्यंत ऋषभच्या अनेक तपासण्याही झाल्या आहेत. पंतच्या डोक्याला आणि पायाला सर्वाधिक दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या घटनेनंतर ऋषभच्या कारचा अपघात कसा झाला? या प्रश्नावर चर्चा सुरु झाली आहे.
पोलिसांनी कार चालवताना ऋषभचा डोळा लागल्यामुळे अपघात झाला असल्याचं म्हंटलं आहे. याच प्रश्नाच उत्तर शोधताना रस्त्यावरील खड्डे सुद्धा ऋषभच्या अपघाताला कारण ठरल्याच स्थानिकांनी सांगितलं आहे. अश्यातच, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नुकतंच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ऋषभ पंतची रुग्णालयात जाऊन घेतली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले, “पंतने सांगितलं की, तिथे काही खड्डे होते, जे अंधारात अचानक समोर आले. ते खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात कार डिवायडरला धडकली. असं धामी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, सध्या ऋषभ पंतची तब्येत चांगली आहे. पंतला मिळणाऱ्या मेडिकल ट्रीटमेंटवर त्याचं कुटुंब समाधानी असल्याचं देखील मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलं आहे. दरम्यान, अजून काही दिवस क्रिकेट ऋषभ पंतला रुग्णलयातच विश्रांती घ्यावी लागणार आहे.