नाशिक – नाशिक शहरानजीक आज दुपारी एका एसटी बसने सात वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात नाशिक-पुण महामार्गावरील पळस गावाजवळ सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला तर अपघातानंतर काही क्षणातच एसटी बस आगीत भस्मसात झाली.
रवींद्र सोमनाथ विसे आणि मदन दिनकर साबळे असे अपघतातील मृतांची नावे आहेत. हे दोघेही युवक नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील समशेरुपुर येथील रहिवाशी असून ते नाशिकला लग्नासाठी येत असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक-पुणे महामार्गांवर शिंदे पळशे गावाजवळील स्पीड ब्रेकरजवळ एका कारने वेग कमी करून जात असताना तिच्यामागे सिन्नर आगाराची बस धावत होती. सिन्नर आगाराच्या बसच्या मागे तीन दुचाकीस्वार येत होते. याचवेळी पाठीमागील बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या राजगुरूनगर आगाराच्या एसटीचा ब्रेक निकामी झाल्याने पुढील तिन्ही दुचाकींना जोरात धडक दिली.
यात दोन मोटार सायकल राजगुरूनगर आगाराच्या बसच्या इंजिनच्या भागात घसरत घुसल्याने दुचाकीने पेट घेतला. त्यात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच तिन्ही दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. राजगुरूनगर आगाराची बस देखील पूर्ण जळाली आहे. तत्पूर्वी, स्थानिक लोकांनी जळत्या बसच्या खिडक्या तोडल्याने 43 प्रवाशांची सुटका केली. या अपघातात सुमारे 25 प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी बिटको हॉस्पिटल नाशिक रोड, जिल्हा रुग्णालयात व सिन्नर येथे दाखल केले आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड अग्निशमन केंद्रातील दोन अग्निशमन दल आणि शिंगाडा तलाव अग्निशमन केंद्राची एक रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाली आणि आग विझवण्यात आली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.