हिंगोली – भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आज राजीव सातव यांच्या गावात भारत जोडो यात्रेचा मुक्काम आहे. राहुल यांच्या रूपाने माझा राजू घरी येत आहे, अशी भावना व्यक्त करत दिवंगत काँग्रेस खासदार राजू सातव यांच्या आई व माजी मंत्री रजनी सातव यांना अश्रु अनावर झाले. भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात पोहोचली असून आज रात्री राहुल गांधी कळमनुरी येथे मुक्कामी थांबणार आहेत. यावेळी ते रजनी सातव यांचीही भेट घेणार आहे.
आठवणी विसरू शकत नाही –
माजी मंत्री रजनी सातव म्हणाल्या की, आज राजीव सातव असते तर राहुल गांधी यांचे आणखी भव्य स्वरूपात स्वागत केले असते.. आबालवृद्धाचा उत्साह पाहण्याजोगा राहिला असता.. मात्र दुर्दैवाने माझ्या राजूला नियतीने हिसकावून नेले.. यांच्या आठवणी मी विसरू शकत नाही.
राजीव गेल्यामुळे विकासाला खिळ –
रजनी सातव म्हणाल्या, राजू सातव यांनी पक्षासाठी भरीव योगदान दिले. हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी कायम प्रयत्न केले. मोठे प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात आणले. विकासासाठी निधी असा कसा उभा करायचा याची जाण त्यांना होती. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी झपाटून काम केले. मात्र त्यांच्या अकाली जाण्याने हिंगोली जिल्ह्याच्या विकासाला खिळ बसली. राजू यांच्या जाण्याने केवळ सातव कुटुंबीयांचेच नवे तर पक्ष व जनतेचे नुकसान झाल्याचे सांगताना रजनी सातव यांचा कंठ दाटून आला..
राहुल गांधी हिंगोलीकडे लक्ष देतील –
रजनी सातव म्हणाल्या की, भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी आज सायंकाळी कळमनुरी येथे येणार आहे. त्यांच्या रूपाने माझा राजू घरी येत असल्याची भावना निर्माण झाली आहे. माजी खासदार राजीव सातव यांचा जिल्हा म्हणून राहुल गांधी हिंगोली जिल्ह्याचे विकासाकडे नक्की लक्ष देतील, असा विश्वास माजी मंत्री सातव यांनी व्यक्त केला.
राहूल गांधींना विनंती करणार –
तसेच राहूल गांधी घरी आल्यानंतर आमच्या जिल्ह्याच्या विकासाकडे तसेच आमच्या कुटुंबाकडे लक्ष राहू द्या. अशी विनंती त्यांना करणार आहे, असेही रजनी सातव म्हणाल्या.