Bail to Jitendra Avhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारहाण प्रकरणात शुक्रवारी अटक करण्यात आली होती. यानंतर शनिवारी त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर आव्हाड यांच्या वकिलांनी त्यांच्या जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने आव्हाड यांच्यासह अटक करण्यात आलेल्या पंधरा जणांना, १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्याने हा आव्हाड व त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मोठा दिलासा मानला जातोय.
नेमकं काय आहे प्रकरण? | Bail to Jitendra Avhad
हर हर महादेव या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आक्षेप घेत या चित्रपटाचे शो बंद पाडण्यासाठी आव्हाड व त्यांचे कार्यकर्ते ठाण्यातील एका चित्रपटगृहात घुसले होते. यावेळी आव्हाड व त्यांच्या कार्यकर्त्यांवर चित्रपट पाहण्यास आलेल्या एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुन्ह दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी आव्हाड यांना अटक केली होती.
राजकीय वातावरण तापलं
जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत भाष्य करताना, सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. दुसरीकडे सत्ताधारी भाजप नेत्यांनी मात्र आव्हाड यांची अटक योग्यच असल्याचा दावा केला. कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही असं भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटांवरून वाद
राज्यसभेचे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी, पुण्यात पत्रकारपरिषद घेत, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास चित्रपटांमधून चुकीच्या पद्धतीने मांडण्यात येत असल्याचा आरोप केला होता. यावेळी संभाजी राजे यांनी, मावळे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषा, ऐतिहासिक प्रसंग, चित्रपटातील संवाद यांवर आक्षेप घेतला होता. नुकताच प्रदर्शित झालेला हर हर महादेव व महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ यांवर ताशेरे ओढले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही हा मुद्दा उचलून धरला होता.