वाचा प्रत्येकाकडे आहेच. केवळ बोलता येते म्हणून उचलली जिभी आणि लावली टाळ्याला असे करून चालत नाही. आपल्याला समस्या निर्माण होऊच नयेत यासाठी संवाद कसा साधावा नेमके याच विषयी थोडेसे…
संवाद हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आपण विविध माध्यमांद्वारे इतरांशी संवाद साधत असतो. हाच संवाद आपण जर प्रभावीपणे साधू शकलो तर आपण यशस्वी होऊ शकतो. काही व्यक्तींकडे वाक्चातुर्य उपजतच असते. आपल्याकडे वाक्चातुर्य जरी उपजत नसले तरी आपण हा गुण विकसित करू शकतो.
चांगला संवाद साधण्यासाठी आपल्याकडे माहितीही जास्त असणे अपेक्षित असते. आपल्याकडे माहिती असेल तर आपला मुद्दा चांगल्याप्रकारे प्रभावीपणे मांडू शकतो. आपला मुद्दा मांडताना “मला वाटते 15-20 व्यक्तींची निवड झालेली आहे.’, “भरपूर लोकांनी आजपर्यंत आमच्या या योजनेचा लाभ घेतलेला आहे.’, “एकदा तुम्ही आमच्या संस्थेचे सदस्य झाला की भरपूर सवलती मिळतील.’ अशी मोघम, संदिग्ध विधाने करून आपण समोरच्या व्यक्तीला प्रभावित करू शकत नाही.
उलट अशा प्रकारच्या विधानांनी सुसंवादाऐवजी विसंवादच होत असतो. “आज 18 व्यक्तींची निवड केलेली आहे.’ “गेला महिना अखेरपर्यंत आमच्या या योजनेचा लाभ 1837 व्यक्तींनी घेतलेला आहे.’ “तुम्ही आमच्या संस्थेचे सदस्य झाला की, आरोग्य तपासणीमध्ये 15 टक्के सवलत, मोफत वैद्यकीय सल्ला, घरगुती छोट्या कार्यक्रमांसाठी संस्थेचे सभागफह 50 टक्के सवलतीत उपलब्ध होईल, वर्षातून एकदा एकदिवसीय सहल मोफत या सवलती मिळतील.’ असा संवाद साधण्यासाठी आपल्याला माहिती असणे आवश्यक असते.
अशा प्रकारे ठोस माहितीपूर्ण विधाने ठामपणे करून आपण समोरच्या व्यक्तीला आपण प्रभावित करू शकतो आणि जरी ती व्यक्ती प्रभावित झाली नाही तरी नकारात्मक संदेश आपण देत नसतो. ज्यामुळे विसंवाद होत नाही. सोप्या शब्दात, झाला तर फायदाच होतो. आपण अशा प्रकारे आकडेवारी, माहिती देत असताना जी खरी माहिती आहे तीच द्यावयाची, जी माहिती खात्रीशीर रित्या माहीत नसेल ती द्यावयाचीच नाही. आपल्याला समोरच्या व्यक्तीचा काहीच अंदाज नसतो, आपण त्याला खोटी माहिती देऊ लागलो आणि ती व्यक्ती जर त्या क्षेत्रातील जाणकार असेल तर खूपच विपरीत परिणाम होतो.
आपल्याभोवती अनेक व्यक्ती अशा असतात की ज्या आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. बऱ्याच वेळा आपल्या मनात इतर कोणा व्यक्तीविषयी नकारात्मक विचार येत असतात. असे नकारात्मक विचार आपण बोलून दाखवायचेच नसतात. प्रत्येक वेळी आपल्या मनातील भावना ओठांवरच आणायला पाहिजेत असे नाही. आपण योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य तेच बोलले पाहिजे. हे संतुलन आपल्याला राखायलाच हवे.
धटाशी आणावा धट। उद्धटाशी पाहिजे उद्धट।।
खटनटाशी खटनट। अवश्य करी।। दासबोध 19.9.30।।
या समर्थ वचनाप्रमाणे आपण वागावे. हेच जर आपण त्याच वेळी म्हणजे ज्या वेळी ती व्यक्ती आपल्याशी वाईट वागली त्यावेळी भडाभडा राग व्यक्त करून मोकळे झालो तर ती व्यक्ती सावध होईल, आपल्याला टाळेल, तसेच त्याच्या वागण्यात कोणतीही चूक करणार नाही, कारण हुषार फक्त आपणच नव्हे तर तोही हुशार आहे. यामुळे आपल्याला त्याला धडा शिकविण्याची संधीच मिळणार नाही. अशी संधी मिळविण्यासाठी आपण शांत राहणे केव्हाही चांगलेच.
जसे आपण इतरांना आपल्या बोलण्यातून प्रभावीत करण्याचा प्रयत्न करत असतो तसेच इतरही आपल्यावर हाच प्रयोग करीत असतात. अशा व्यक्तींशी संवाद साधत असताना आपण आपल्या माहितीवर, ज्ञानावर पूर्ण भरोसा ठेवायचा, जी माहिती तो देतो ती चुकीची आहे असे आपल्याला वाटत असेल तर त्याला त्याबाबतीत जास्त बोलते करून त्याचा अंदाज घ्यावयाचा. तो त्याची माहिती बरोबर आहे असे जर खात्रीपूर्वक सांगत असेल तर तो कुठेतरी आपल्या फसवू पहात आहे असे समजावे. त्याला तो कसा चुकीचा आहे हे पटवून देण्याची काहीच आवश्यकता नाही.
आपण त्याच्याशी बोलणे थांबवून आपल्या पुढील कामाला लागायचे. पण एक मात्र पथ्य पाळावयाचे ते म्हणजे, तो आपल्याला फसवू पाहात आहे हे नेमके कोणत्या मुद्द्यामुळे आपल्या लक्षात आले आहे हे त्याला कळू द्यावयाचे नाही. आपण जर त्याला सांगितले तर पुढच्या व्यक्तीशी बोलताना सावध होईल आणि काही वेगळा मार्ग अवलंबेल. असे केले तर पुढील व्यक्ती त्याच्या कुटील कारस्थानात अडकेल, नेमके हेच आपण टाळावयाचे आहे. पुढील व्यक्तीला त्या धोकेबाज माणसाच्या जाळ्यातून सुटण्यासाठी वाट मोकळी ठेवली पाहिजे.
आपण कोणत्याही व्यक्तीबाबत नकारात्मक बोलावयाचे नाही. भले आपल्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी खूप राग असो. पण तो राग आपण इतर कोणी त्रयस्थ व्यक्तीसमोर व्यक्त करावयाचा नाही. आपल्याशी बोलताना कोणी एखादी व्यक्ती अन्य तिसऱ्याच व्यक्तीबाबत काही नकारात्मक बोलून आपले मत जाणून घेण्याचा प्रयत्न करते, अशा वेळी आपण विषय बदलावा किंवा काही बोलावे लागलेच तर अगदी कमी बोलावे आणि जे बोलावे ते सकारात्मक किंवा तटस्थ भूमिका घेऊनच बोलावे. आपण जर नकारात्मक प्रतिक्रिया दिली तर ती प्रतिक्रिया त्या संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचते आणि विनाकारण संबंधात वितुष्ट निर्माण होत असते. आपण आपल्या जिभेवर नेहमीच मध ठेवायचे. आपण नेहमीच बोलून गोड असायला हवे.
बऱ्याच वेळा हाणामारी करून काहीच साध्य होत नाही ते गोड बोलून होत असते हे लक्षात घ्यावे. आपली जीभ ही कात्रीपेक्षाही जास्त धारदार असल्याने आपल्या जीभेची धार चांगल्या हेतूने वापरायची कि वाईट हेतूने हे आपल्याच हाती आहे. म्हणूनच आपण आपल्या मनमंदिराच्या गाभाऱ्यात बसून मनोदेवतेला आपण रसना ताब्यात ठेवण्याचे पुष्प समर्पित केले तर मनोदेवतेकडून आपल्या जो प्रसाद मिळणार आहे त्यामुळे आपण आपल्या मार्गातील बऱ्याच बाधा सहजपणे दूर करणार आहोत.
– अनिकेत भालेराव