सिंहगडरस्ता, दि.12 (प्रतिनिधी) – पालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वडगाव बुद्रुक मधुकोष सोसायटीजवळ 40 लाख लिटर पाणीटाकीचे बांधकाम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले. पण, अजूनही या टाकीद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे ही यंत्रणा फक्त शोभेपुरती आहे का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.
दरम्यान, वर्षभरापूर्वी टाकीचे काम झाले असले, तरी परिसराची अवस्था दयनीय झाली आहे. टाकीचा परिसर सताड मोकळा असून, येथे भटक्यांसाठी आयती “बैठक’ व्यवस्था झाली आहे. अंधाराचा फायदा घेऊन मद्यपीदेखील या भागात वावरत आहेत. टाकीच्या परिसरात महापालिकेचा सुरक्षा कर्मचारीही नसतो. याच भागात काही मजूर वास्तव्यास राहिले आहेत. त्यांनी तेथे हक्काची वस्ती निर्माण केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरामध्ये अंधाराचे साम्राज्य आहे. या परिसरात विजेची व्यवस्था करावी. महापालिकेने सुरक्षा कर्मचारी त्वरित नेमावा, अशी मागणी सारंग नवले यांनी केली आहे. दरम्यान, टाकी सुरळीतपणे कार्यरत झाल्यास या भागांतील पाणीपुरवठा व्यवस्थित आणि पुरेसा होणार आहे, असे स्थानिक नागरिक सांगत आहेत.
पाणी टाकीशी संबंधित पाइपलाइनचे काम कंत्राटदाराकडून पूर्ण होत आले आहे. परंतु अजूनही ही टाकी सुरू झाली नाही. त्याचा लाभ नागरिकांना केव्हा मिळणार? यासंदर्भात त्यांनी आयुक्तांशी पत्रव्यवहार आणि वारंवार पाठपुरावा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. परंतु प्रशासक राज असल्यामुळे की काय, या टाकीमध्ये पाणी यातला अजून मुहूर्त सापडत नसल्याची स्थिती आहे.
– सारंग बाळासाहेब नवले, भारतीय जनता युवा मोर्चा
या टाकीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच लाइन जोडचे कामही झाले आहे. महिनाभरात येथून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल. या परिसरात काही गैरसोय असेल, तर त्याची तातडीने प्रशासनाकडून दखल घेण्यात येईल.
– अनिरुद्ध पावसकर, विभागप्रमुख, पाणीपुरवठा, मनपा