शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डी ग्रामस्थ व भाविकांच्या मागणीची दखल घेत साई संस्थान प्रशासनाने साई समाधी मंदिरातील काचा व जाळ्या काढल्या. यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. भाविकांना आता साई समाधीला स्पर्श करून व नतमस्तक होऊन दर्शन घेण्यातील अडथळा दूर झाला आहे. द्वारकामाई मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुले ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय संस्थान प्रशासनाने घेतला आहे.
साई समाधी मंदिरात समाधीच्या बाजूने लावलेल्या काचा व स्टीलच्या जाळ्यामुळे साईंचे दर्शन लांबूनच हात जोडून घ्यावे लागत होते. वास्तविक साई समाधीला स्पर्श करून व नतमस्तक होऊन आशीर्वाद मिळावे, अशी शिर्डी ग्रामस्थ व भाविकांची मागणी होती. याविषयी अनेक भाविकांनी व ग्रामस्थांनी साई संस्थान प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र, त्यावर निर्णय न घेतल्याने संस्थान प्रशासनाच्या या भूमिकेविषयी सर्वपक्षीय ग्रामस्थांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांची भेट घेऊन भाविकांच्या भावना व मागणीविषयी चर्चा केली.
त्याचा सकारात्मक विचार करून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार विखे पाटील व खासदार लोखंडे यांनी संस्थान प्रशासनाशी चर्चा केली. त्याच चर्चेचा परिपाक म्हणून बुधवारी साई संस्थान प्रशासनाने समाधीच्या काचा व जाळ्या काढल्या. द्वारकामाई मंदिरात भाविक निवांत बसून दर्शनाची सुविधाही सुरू केली आहे. विशेष बाब म्हणजे द्वारकामाई मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुले ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय संस्थान प्रशासनाने घेतला आहे. भाविकांना आनंदाने व समाधानकारक दर्शनाचा लाभ मिळाल्याने शिर्डी ग्रामस्थ तसेच भाविकांनी सर्वांना धन्यवाद दिले.
शिर्डीचे कमलाकर कोते यांनी सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली गुरुस्थान मंदिर, गणपती मंदिर, शनी मंदिर, दत्त मंदिर यांच्या भोवताली असलेल्या बॅरिगेट्सचा अडथळा संस्थान प्रशासनाने हटवावे, अस निवेदन दिले आहे. या निवेदनावर निर्णय न घेतल्यास मोठं जनआंदोलन उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. यावर आंदोलनाची पुढील दिशा कशी असावी, याकरिता सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थ व भाविकांची शनिवार दि. 12 नोव्हेंबर रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे आता संस्थान यावर काय निर्णय घेते हे महत्वपूर्ण ठरणार आहे.