भगवानबाबांच्या चरणी लीन
पाथर्डी – सन 2019नंतर राज्याला बदनामीची कीड लागली आहे, ही कीड थांबवली गेली पाहिजे अशी जनतेची मागणी आहे. भाजपला मोठ्या प्रमाणात सत्तेची गुर्मी झाली असून, त्यांचे डोळेच आता आंधळे झाले आहेत. त्यांना वास्तविकता कळायला कान नाहीत, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
पाथर्डी तालुक्यातील संत भगवानबाबांच्या समाधी दर्शनासाठी भगवानगड येथे आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली भावना व्यक्त केली. या वेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष नासीर शेख, उपाध्यक्ष आनंद सानप, जालिंदर काटे, प्रकाश शेलार, आकाश काळोखे, मुन्ना खलिफा, राहुल ढाकणे, गणेश दिनकर, सुनील दौंड, बाबासाहेब वाघ, सुभाष भाबड, पोपट बडे, वसंत खेडकर यांनी जंगी स्वागत केले.
पटोले म्हणाले की, भगवानगड हा समाजसुधारकांचा गड आहे. भगवानबाबांनी या मागास भागातील पीडित बहुजनांच्या लोकांना दिशा देण्याचे काम केले आहे. विशेष करून ओबीसी समाजासाठी भगवानबाबांचे मोठे काम आहे. राज्यात आणि देशात ओबीसी चळवळ उभी करण्यासाठी भगवानगडापासून सुरुवात करावी लागणार म्हणून आज ऐश्वर्यासंपन्न संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या आशीर्वादानंतर ही चळवळ प्रभावी करण्याचा निर्धार पटोले यांनी केला असून महाराष्ट्रात पुन्हा कॉंग्रेसची सत्ता आल्यावर पहिले भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले जाईल. पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे झालेला दसरा मेळावा आणि मी गडावर येणे हा फक्त योगायोग आहे. यामागे कोणतेही राजकारण नाही.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत माझ्या हत्येचा कट रचला होता त्यावर बोलताना पटोले म्हणाले की, सध्या राज्यात अतिशय वाईट राजकीय परिस्थिती झाली आहे. सन 2014 पासून केंद्रातले सरकार आल्यापासून आणि आता 2019 पासूनची भयानक परिस्थिती देशांमध्ये असून, राज्याला बदनाम करण्याचे काम सुरू आहे.
राज्यात विचित्र परिस्थिती सध्या निर्माण झाली असून, शाहू, फुले, आंबेडकर आणि भगवानबाबांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र पुन्हा एकदा बनवावा यासाठी भगवानबाबांना साकडे घातले आहे.
देश आणि राज्य पातळीवर द्वेषाचे राजकारण चालू असून, जनतेचे खऱ्या अर्थाने प्रश्न सोडायला पाहिजे तो सर्व निधी गोठवला गेला. त्यामुळे राज्यामध्ये कुठे रस्ते नाही, सर्वत्र खड्डे पडले आहेत. अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे निरपराध लोकांचे जीव चालले आहे.
कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी व कॉंग्रेस पक्षाने घेतलेल्या धोरणावर खिल्ली उडवण्याचे काम भाजपची मंडळी करत आहेत. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशसुद्धा आज आम्हाला मदत करा, असे आवाहन मीडियासमोर करतात. त्यामुळे न्यायव्यवस्था धोक्यात येऊन देशाच्या तिरंगा व संविधान वाचवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे राहुल गांधी पदयात्रेच्या माध्यमातून लढत आहे. भाजपवाले जेवढे राहुल गांधी यांची चेष्टा करते तेवढेच लोक त्यांच्याबरोबर पदयात्रेच्या माध्यमातून जुळत आहेत. नागपूरची चड्डी घातल्यावर तुम्ही थेट सहसचिवापर्यंत जातात अशी प्रशासकीय व्यवस्था करून संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था संपून टाकल्याची टीका पटोले यांनी या वेळी केली.
या वेळी आ. राजेश राठोड, भानुदास माळी, राजेंद्र राख, अशोक पाटील, कल्याण काळे, इसूफ लीडर, राजेसाहेब देशमुख, केशर मोटवानी, सुशीला मोराळे, शुभांगी शेरकर, दादासाहेब मुंडे, बाळासाहेब सानप आदी कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक दुर्घटनेला भाजपच जबाबदार
-नाशिक येथील झालेला अपघात हा रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादामध्ये झाला असून, या अपघातातील मृत्यूचे वाटेकरी हे राज्यातील भाजपचे सरकार असल्याची टीका पटोले यांनी केली.
ती वेगळीदिल्ली होती!
-स्व. गोपीनाथ मुंडे आणि मी सोबत काम केले आहे. आम्ही काय वेगळे नव्हतो. त्यांना इथून दिल्ली दिसायची. ती वेगळी दिल्ली होती. मलाही येथून दिल्ली दिसते. मात्र, आताच्या दिल्लीत बसलेल्या अत्याचारी व्यवस्थेचा नायनाट झाला पाहिजे, असाच भगवानबाबांकडे आशीर्वाद मागितला आहे, असे शेवटी पटोले म्हणाले.