फलटण – नीरा खोऱ्यातील अतिशय सुबत्ता असलेल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात केलेल्या अडचणी आपल्याला भोगाव्या लागल्या. परंतु, आता शेतकऱ्यांना पेमेंट, कामगारांना पगार, असा कारखाना नफ्यात असल्याने आता कारखान्याला विरोधकच राहिलेले नाहीत. पाणी आणण्यासाठी आपण आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले पण आम्हाला कारखाना काढायचा म्हणून समजलेच नाही. आता पाणी आमचं आणि कारखाना यांचा परंतु हा कारखाना थोड्याच दिवसांत विकावा लागेल, असा टोला विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना नाव न घेता लगावला.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल शुक्रवारी दि. 30 रोजी कारखान्याच्या कार्यस्थळावर झाली. त्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवरुपराजे खर्ङेकर, डी. के. पवार, विश्वासदादा गावडे, धनंजय पवार, मोहनराव नाईक निंबाळकर, प्रा. भीमदेव बुरुंगले, अशोकराव पवार, चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हाइस चेअरमन नितीन भोसले व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक सी. डी. तळेकर, अधिकारी, कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीराम कारखाना अवसायानात न काढण्याच्या रामराजे यांच्या भूमिकेमुळे ही सर्वसाधारण सभा होत असल्याचे स्पष्ट करुन संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी श्रीराम सहकारी साखर कारखाना आणि जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी या दोन सहकारी कारखान्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग या भागीदारी संस्थेने पुढील 15 वर्षे एकत्र सोबत राहण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे आज चर्चा फक्त नफा किती झाला याचीच होत आहे, असे स्पष्ट केले. श्रीरामची गाळप क्षमता वाढविणे आवश्यक असून यंदा 4200 सरासरीने साडेसहा लाख टन उसाच्या गाळपाचे लक्ष्य असून अर्कशाळेची कार्यक्षमता वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. कारखाना गाळप क्षमता वाढ, अर्कशाळेत इथेनॉल निर्मिती करताना सध्याच्या 3000 मे. टन प्रतिदिन गाळप क्षमता वाढवून 30 हजार मे. टन करणार असून ऊस वजन काटे, क्रेन अत्याधुनिक पद्धतीचे करण्यात येईल, तसेच दि. 15 पर्यत कारखाना सुरु करणार असल्याचे डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सांगितले.
श्रीराम कारखान्याचे प्रेरणास्थान मालोजीराजे यांचे नाव पाडेगाव येथील उस संशोधन केंद्राला नाव देण्याचा मांडलेला ठराव या सभेत एकमताने संमत करण्यात आला. श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब, श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब, माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करुन अभिवादन केल्यानंतर सभा सुरु झाली. कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी सभेची नोटीस वाचन केले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सुभाषराव गायकवाड, बाबा भोई, रामहरी भापकर व अन्य सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना संजीवराजे व डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी उत्तरे दिली. संचालक संतोष खटके यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. सुखदेव बेलदार पाटील यांनी आभार मानले.