पुणे – राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या भाषणातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये त्यांनी मराठा आरक्षणावरून वादग्रस्त विधान केल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सावंत यांनी माध्यमांसमोर मराठा समाजाची माफी मागितली आहे. त्यांच्या विधानावरून राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावंत यांची बाजू घेतली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एखादे वाक्य म्हटले की त्याची मोडतोड करून ते समोर आणले जाते. ग्रामीण आणि शहरी भावना व्यक्त करण्याची शैली वेगळी असते. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो. माझी हात जोडून विनंती आहे की ज्यावेळी एखादी मागणी होते किंवा तानाजी सावंत असे वक्तव्य करतात त्यावेळी उठ सूट गैरसमज करून घेण्याची काही गरज नाही, असे पाटील यांनी म्हंटले आहे.
पाटील पुढे म्हणाले की, तानाजी सावंतांची भाषा ग्रामीण भागातील लोकांना चांगली समजते. मराठा समाजाला आरक्षण जवळजवळ स्वातंत्र्यापासून पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी दिलं. त्यानंतर ते रद्द केल्यानंतर अडीच वर्षात कोणीही आंदोलने केली नाहीत किंवा मोर्चा काढण्याची भाषा केली नाही, असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता. मात्र अनेकांनी त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला आणि त्यावरुन आक्रमक झाले.
काय म्हणाले होते तानाजी सावंत ?
आता मराठा समाजाकडून आम्हाला ओबीसी किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी केली जात आहे. या सगळ्यामागचा कर्ता करविता कोण आहे, हे तुम्हा-आम्हाला समजणे गरजेचे आहे. सगळ्यांना याबाबत माहिती आहे, पण कोणी बोलत नाही. दोनवेळा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प राहिला. पण आता राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला लगेच मराठा आरक्षणाची खाज सुटली, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले आहे.