नगर -रेखा जरे हत्याकांड प्रकरणात काहीही संबंध नसताना पोलिसांनी विनाकारण गोवले. एफआयआरमध्ये नावे नाही, दोषारोप पत्रामध्ये सबळ पुरावा नसताना सुद्धा खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. त्यामुळे या गुन्ह्यातून आमची नावे वगळण्याची मागणी हैद्राबाद येथील तीन आरोपींनी आज न्यायालयात अर्जाद्वारे केली. यावर 28 तारखेला सुनावणी होणार असून, सरकारी पक्षाकडून युक्तिवाद केला जाणार आहे. याचदिवशी दोषारोपपत्र निश्चित केले जाणार आहे.
सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खूनप्रकरणात दोषारोप निश्चितीसाठी आज जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्यासमोर सुनावणी झाली. यातील एक आरोपी अब्दुल रहेमान अब्दुल आरिफ गैरहजर होता. तर नाशिक येथील कारागृहात अटकेतील बाळ बोठे, सागर भिंगारदिवे यांच्यासह सहा आरोपींनी ऑनलाईन हजेरी लावली. या गुन्ह्यातील आरोपी राजशेखर चकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहेमान अब्दुल आरिफ यांनी ऍड.महेश तवले यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जात पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
रेखा जरे यांचा खून जातेगाव घाटात झाला. यातील दाखल एफआयआरमध्ये नावे नाहीत. पा दोषारोपपत्रामध्ये सबळ पुरावा नाही. त्यामुळे या गुन्ह्यातून नावे वगळण्याचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर दि.28 रोजी सुनावणी होणार आहे. सरकारी पक्षाच्यावतीने फिर्यादीचे वकील ऍड.सचिन पटेकर उपस्थित होते.