संगमनेर – कॉंग्रेसची विचारधारा ही राज्यघटनेवर आधारित आहे. आज भारत हा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रगत देश म्हणून ओळखला जातो, ती कॉंग्रेसची देण आहे. मात्र सध्या काहीजण जाती-धर्माच्या नावावर राजकारण करत आहे. हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. ईडी सीबीआयसारख्या यंत्रणांचा वापर करून विविध राज्यांमध्ये सरकार बरखास्त केली जात आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा दुरुपयोग या जातीयवादी शक्तींनी केला आहे. सध्या देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. साहित्यिक, पत्रकार, विचारवंतांना कैद केले जात आहे. या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या हुकूमशाही विरुद्ध कॉंग्रेस लढत असल्याचे प्रतिपादन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले.
यशोधन कार्यालयाजवळ शेतकी संघाच्या प्रांगणात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सव कार्यक्रमानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार छगनराव भुजबळ होते. यावेळी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे,राजस्थान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग डोटासरा, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार उल्हास पवार, सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, शरयुताई देशमुख, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, माधवराव कानवडे ,बाजीराव पा.खेमनर आदी उपस्थित होते.
यावेळी थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ विचारवंत डॉ. अ. ह. साळुंखे यांना हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने डॉ. सुधीर भोंगळे यांना तर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीने सहकारातील नेतृत्व पुरस्काराने माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांना गौरवण्यात आले. 1 लाख रुपये रोख,सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गेहलोत म्हणाले, महाराष्ट्र ही संत व समाजसुधारकांची भूमी आहे. महाराष्ट्राने कायम देशाला दिशा दिली असून सहकारातून ग्रामीण भागात समृद्धी निर्माण करण्यात स्वर्गीय भाऊसाहेब थोरात व डॉ.अण्णासाहेब शिंदे यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून सर्वधर्मसमभाव व लोकशाही विचार जपणाऱ्या कॉंग्रेसमुळे समृद्ध भारताची उभारणी झाली आहे. आमदार बाळासाहेब थोरात हे मोठा जनाधार असलेले लोकनेते असून राष्ट्रीय पक्ष अध्यक्षपदाचा अर्ज भरण्याअगोदरचा संगमनेरच्या सहकार पंढरीतील कार्यक्रम हा शुभसंकेत दिले आहे.
आ. भुजबळ म्हणाले की, सध्या जातीयवादी सरकार सत्तेवर आले आहे. भाजप हे केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहेत. समतेचा विचार व लोकशाही टिकवायची असेल तर या जातीवादी शक्तीविरुद्ध एकवटले पाहिजे. थोरात व शिंदे या विचारवंतांनी समाज प्रबोधनाचा मंत्र सहकारातून दिला. तो संपूर्ण देशासाठी आदर्शवत आहे.
आ. थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून तालुक्याच्या समृद्धीचा पाया घातला तर डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणले. देशाला हरित क्रांतीचा मंत्र दिला. या दोन महान विभूतींच्यामुळे हा प्रदेश सुपीक झाला असून त्यांचे विचारांवर आपली वाटचाल सुरू आहे.
यावेळी राजस्थान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंगजी डोटासरा, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अ. ह. साळुंखे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, डॉ. सुधीर भोंगळे यांचीही भाषणे झाली. स्वागत आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर बाबासाहेब ओहोळ यांनी आभार मानले.