कोविडसारख्या महामारीचा सामना करताना मेटाकुटीला आलेले असतानाच देशभरात सध्या लम्पी या पाळीव प्राण्यांमधील आजाराने नवे आव्हान उभे केले आहे. दुग्धोत्पादनात यामुळे घट होत असल्याने गावगाड्याचं पर्यायाने देशाचं अर्थकारण कोलमडून टाकणाऱ्या या आजारावर तात्काळ नियंत्रण आणले गेले पाहिजे.
कृषिक्षेत्र आणि कृषीअर्थकारणात पशुधनाचे महत्त्व आहे. या पशुधनामध्ये बैल, गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबडी यांचा समावेश होतो. कृषिक्षेत्राला संलग्न व्यवसाय म्हणजे दुग्धोत्पादन. गायी, म्हशींच्या माध्यमातून हा उद्योग नव्या उंचीवर पोहोचला आहे. यामुळे गावगाड्याचेच नव्हे तर देशाचेही अर्थचक्र फिरते आहे. पण आता या अर्थचक्रावर एक संकट ओढावले आहे. पाळीव जनावरांमध्ये वेगाने पसरणाऱ्या लम्पी स्कीन आजाराने देशातील पशुधनाला विळखा घातला आहे. लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे तो अधिक धोकादायक ठरत आहे. या संसर्गजन्य आजारामुळे राज्यातील जवळपास 20 पेक्षा अधिक जिल्हे प्रभावित झाली आहेत. शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जिल्ह्यांतच हा प्रादुर्भाव वाढल्यामुळे चिंता निर्माण होणे साहजिकच आहे.
महाराष्ट्राबाहेर जवळपास 12 राज्यांमध्ये लम्पीने थैमान घातले आहे. यामध्ये गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीसह अन्य राज्यांचा समावेश आहे. वास्तविक, लम्पीची साथ 2019 मध्येच सुरू झाली. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये या आजाराच्या पहिल्या रुग्ण गायी आढळल्या. मात्र तेव्हा भारतासह उभे जग करोनाशी झुंजत असल्याने ही साथ रडारवर आली नाही. गेल्या उन्हाळ्यात लम्पीने पुन्हा डोके वर काढले आणि बघता बघता पश्चिम आणि उत्तर भारतातील दूध उत्पादक राज्यांमध्ये म्हणजेच महाराष्ट्रापासून काश्मीरपर्यंत एलएसडी पसरला. महाराष्ट्रात सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यात 4 ऑगस्टला हा आजार आढळून आला होता.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या चिनावल नावाच्या गावात लम्पी स्कीन आजाराची लागण झाल्याचे आढळले. त्यानंतर हा रोग अहमदनगर, धुळे, अकोला या जिल्ह्यानंतर पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर या जिल्ह्यातही झपाट्याने पसरला आहे.
राजस्थानात गोपालन मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे तिथे लम्पीचा प्रसार-प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे. राजस्थानच्या 33 पैकी 32 जिल्ह्यांमध्ये 7.94 लाख गायींना एलएसडीची लागण झाली असून जवळपास 35 हजार गायींचा मृत्यू झाला. देशभरात जवळपास 58 हजारांहून अधिक जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातही या आजाराने अनेक जनावरांचा बळी घेतला असून जवळपास तीन हजारांपेक्षा अधिक जनावरे या आजाराने प्रभावित झालेली आहेत. साहजिकच या संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना होणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकारी आणि केंद्र सरकारी पातळीवर त्वरित हालचाल होणेदेखील महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांमध्ये या आजाराबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. संक्रमित झालेल्या जनावरापासून इतर जनावरांना वेगळे ठेवणे गरजेचे आहे. कोविड महामारीच्या काळात ज्याप्रमाणे विलगीकरण करावे लागत होते तशाच प्रकारे आता बाधित जनावरे इतर जनावरांमध्ये मिसळणार नाहीत याची काळजी घ्यावी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी बाधित जनावरांना क्वारंटाइन केले जाणार असल्याची घोषणा केली आहे.
एखादा पाळीव प्राणी लम्पी स्कीन या आजराने ग्रस्त आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्याची काही लक्षणे पाहणे महत्त्वाची आहेत. यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जनावरांचा ताप तपासा. जनावरांना ताप असेल तर लगेच पशुवैद्यकाला दाखवणे गरजेचे आहे. या आजाराचे ठळक लक्षण म्हणजे जनावरांच्या त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी दिसतात. या गाठी डोळ्यांना देखील दिसून येतील इतक्या मोठ्या आकाराच्या असतात. अशा गाठी दिसल्यास सदर प्राणी लम्पी आजाराने बाधित झाल्याचे लक्षात येईल. तिसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे जनावरांच्या तोंडात, घशात व श्वसननलिका तसेच फुफ्फुसात पुरळ व फोड येतात. ही लक्षणे साध्या डोळ्यांनी दिसणार नाहीत. अशावेळी पशुवैद्यकाचा सल्ला घ्या. याखेरीज लम्पी आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळगळती सुरू असते. जनावर एक दोन दिवसांपासून अधिक प्रमाणात तोंडातून लाळ गाळत असेल तर खबरदारीचा उपाय म्हणून त्याची तपासणी करून घ्या. आणखी महत्त्वाची लक्षणे म्हणजे जनावरांना खूप अशक्तपणा येतो. जनावरांची भूक मंदावते. त्यामुळे ते काही खातपीत नाहीत. जनावरांच्या डोळ्यांमध्ये जखमा तयार होऊ लागतात. वरीलपैकी कोणतेही लक्षणे दिसत असल्यास ताबडतोब पशूवैद्यकांचा सल्ला घ्या.
करोना संसर्गजन्य काळात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामागचा उद्देश असा होता की, बाधित व्यक्ती इतर लोकांमध्ये मिसळली नाही तर या साथीच्या आजाराचा प्रभाव कमी होईल. यात आपण यशस्वीही झालो. हाच उपाय आता जनावरांबाबतही महत्त्वाचा ठरू शकतो. बाधित जनावर इतर जनावरांमध्ये मिसळलेच नाही तर या आजारावर लवकर नियंत्रण मिळवता येईल. लम्पी स्कीन हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे उपचारापेक्षाही प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी ठरेल. प्रामुख्याने गायी, म्हशींमध्ये आढळून आलेल्या या आजाराचे शेळ्या-मेंढ्यांमध्ये आढळणाऱ्या देवीच्या विषाणूशी साधर्म्य दिसून येत आहे. पण सुदैवाने हा आजार शेळ्या-मेंढ्यांना होत नाही. या आजाराची लागण देशी जनावरांपेक्षा संकरीत जनावरांमध्ये अधिक होण्याची शक्यता आहे. हा आजार जनावरापासून मानवात संक्रमित होत नाही, असा निष्कर्ष असला तरी आपण खबरदारी घेणे गरजेचे आहे.
जनावरांना या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी गोठा नेहमी स्वच्छ ठेवा. या आजारावर सरकारकडून काही उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. हा आजार अधिक प्रमाणात पसरण्याचे ठिकाण म्हणजे जनावरांचा खरेदी-विक्रीचा बाजार. कारण जनावरांना काही साथआजार झाल्यास शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण होऊन अशी जनावरे विकण्यासाठी हा बाजार गाठला जातो. अशा ठिकाणी जनावरांची गर्दी झाल्यास बाधित जनावरांमुळे इतर जनावरांनाही या आजाराची लागण होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे सरकारने बाहेरून जनावरे खरेदी करून आणण्यावरदेखील बंदी घातली आहे.
जनावरांचे बाजार, पशू प्रदर्शने, आंतरराज्य व राज्यांतर्गत गोवंशीय पशूवाहतूक, बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे. बाधित जनावरांची वाहतूक तात्काळ थांबविणे गरजेचे आहे. कारण बाधित जनावरे जर वाहतुकीच्या माध्यमातून इतर जिल्ह्यात पोहोचली तर तो जिल्हाही बाधित होण्याचा धोका निर्माण होतो. हाच विचार गावपातळीवरही करणे गरजेचे आहे. शेजारच्या गावांमध्ये जनावरे ने-आण करणे सामान्य बाब आहे. पण एका बाधित गावातील जनावर दुसऱ्या गावात पोहोचली तर ही संक्रमणाची साखळी निर्माण होऊन संपूर्ण राज्य आणि देशातील जनावरे या आजाराने बाधित होऊ शकतात. त्यामुळे एका गावातील जनावरे दुसऱ्या गावात न नेण्याची खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यावी. पशुसंवर्धन विभागाकडून या साथआजाराने प्रभावित झालेल्या गावापासून 5 किमी परिघातील क्षेत्रात लसीकरण करण्यावर जोर दिला जात आहे.
बाधित जिवंत किंवा मृत जनावरांच्या संपर्कात आलेली वैरण नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे; मात्र केवळ एवढे करून भागणार नाही. लम्पी स्कीन साथआजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने टास्क फोर्स गठीत करणे गरजेचे आहे. पशुधन विकास विभाग, महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या समन्वयाने तालुकास्तरावर कृती दल गठीत करून प्रतिबंध व उपचार या दोन्ही पातळ्यांवर काम करणे आवश्यक आहे. आणखी महत्त्वाचा खबरदारीचा उपाय किंवा या आजारावर लवकर नियंत्रण मिळवण्याचा उपाय म्हणजे ज्या गावात, भागात किंवा क्षेत्रात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव आढूळन येत आहे, अशा सर्व ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली पाहिजे.
दूध उत्पादनात भारताचा जगात वरचा क्रमांक लागतो. जगाच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात भारताचा हिस्सा 23 टक्के आहे. परंतु लम्पीच्या साथीमुळे दुग्धोत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याचे संकेत मिळू लागले आहेत. या आजारावर लस उपलब्ध झाल्याने सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. पण त्याचा वेग वाढवून युद्धपातळीवर काम करून ही साथ आटोक्यात आणणे आवश्यक आहे.