प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 – “युवकांनो, भ्रष्टाचारास अजिबात थारा देऊ नका. भ्रष्टाचाऱ्यांना मदतही करू नका आणि त्यांना निवडून देऊ नका. भ्रष्टाचारातून पैसा व पैशांतून सत्ता हे समीकरण बदलण्यासाठी भ्रष्टाचाराचे समूह नष्ट करूनच देशाला पुढे नेता येईल,’ असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या भारतीय छात्र संसदेच्या समारोपप्रसंगी फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीराकुमार, सुमित्रा महाजन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, एमआयटी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड आणि प्रा. राहुल कराड आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, “भारताने जगाला विचारांनी जिंकले आहे. “वसुधैव कुटुंबकम’ संकल्पनेला पुढे नेण्याचे कार्य आपल्याला करावे लागेल. सहिष्णुतेच्या आधारे एकमेकांना पुढे नेत विचारांची कटुता, भेदभाव बाजूला सारत भ्रष्टाचार समूळ नष्ट करणे आवश्यक आहे.
देशाला युवकांकडून मोठ्या अपेक्षा आहे. निडरता आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेने प्रेरित होऊन युवकांनी देशकार्यात योगदान द्यावे,’
सुमित्रा महाजन म्हणाल्या, “चांगले कार्य आवश्यक आहे, पण त्यापेक्षाही चारित्र्य निर्माण महत्वाचे आहे. मन शुद्ध ठेवून कर्तव्य भावनेने पुढे गेल्यास जीवनात निश्चितपणे यशस्वी व्हाल.’ डॉ. विश्वनाथ कराड यांनी आपले विचार मांडले. राहुल कराड म्हणाले, “सर्व राजकीय नेते हे भ्रष्ट नाहीत. त्यामुळे तरूणांनी राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा. भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून चांगले व सुशिक्षित नेते समाजाला देण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाचा आणि देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये युवकांचे योगदान मोलाचे असणार आहे.’
आपण भौतिक प्रगती साधताना मानसिक विकासाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. परिश्रम आणि विवेक एकमेकांशिवाय अर्थहीन आहेत आणि त्यासोबत स्वप्नही आवश्यक आहे. नव्या पिढीने नवे स्वप्न घेऊन समाज घडविण्यासाठी, वंचितांना त्यांचे हक्क देण्यासाठी पुढे यावे.
मीरा कुमार, माजी अध्यक्ष, लोकसभा