विजय शेंडगे
सीमा गांधी या उत्तम संवादिका म्हणून साहित्य परिघाला चांगल्याच परिचयाच्या आहेत. प्रत्येक स्त्री-पुरुषाच्या मनात काव्याचे धुमारे असतातच. ज्यांना कवितेचे ते धुमारे फुलवता येतात त्यांना कवितेचा दरवळ गवसतो. ज्यांना कवितेचा दरवळ सापडतो ते तो दरवळ मनात भरून घेतात. इतरांना वाटून टाकतात. सीमा गांधी यांनाही त्यांच्या मनातील कवितेचे धुमारे फुलवता आले, त्यातून निर्माण झालेला दरवळ श्वासात भरता आला आणि “मनाचे सोहळे’ या काव्यसंग्रहाच्या रूपाने रसिकांना वाटता देखील आला.
आपलं बालपण खेड्यात गेल्याचं सीमा गांधी सांगतात. परंतु ग्रामीण भागातलं गुराढोरांचं, काट्या फुफाट्याचं बालपण त्यांच्या वाट्याला फारसं आल्याचं दिसत नाही किंवा काही माणसांना वेदना झाकून ठेवण्याची आणि हसू उधळण्याची कला अवगत असते, ती कला सीमा गांधी यांनाही अवगत असावी, असे दिसते. त्यामुळे त्यांची कविता आक्रोशी सूर लावत नाही. त्यांची कविता काट्या-फुफाट्याचं भांडवल न करता ग्रामीण भागातील पानं, फुलं, पाऊस, हिरवे डोंगर यात रमते. ग्रामीण निसर्गाला कवेत घेते. त्यांचं बालपण ग्रामीण भागात गेलं असलं तरी त्यांच्या कवितेत पहाटेच्या वाऱ्याने कळीला फुलवावं तशी हळुवारता आहे. ती हळुवारता अत्यंत लोभस आणि स्त्रीसुलभ आहे. त्यामुळेच त्यांना भूवरल्या तरुवेली म्हणजे नियतीने चितारलेली एक प्रकारची नक्षी वाटते आणि त्या लिहितात-
तरुवेलींनी चितारली भूवरी नक्षी
उधळले रंग सर्वत्र गुलबक्षी
बहुरूपी, उतावीळ अश्रू, नवीन क्षितिज, हळवी सांज, परत अशा काही मोजक्या कवितांमध्ये स्त्रीसुलभ वेदनेची एक छटा आहे. पण त्यातही एक हळुवारता आहे. “बहुरूपी’ कवितेत स्त्री आयुष्यात ज्या प्रकारे नातेरूपी विविध भूमिका निभावते त्या विषयी लिहिताना त्या म्हणतात-
निष्णात बहुरूपी असल्यागत वावरते
माझ्याच चेहऱ्यावर अनेक पुटे चढवते
निसर्ग, प्रेम, पाऊस यांची अनेकविध रूपे सीमा गांधी यांच्या कवितेत आढळतात. बऱ्याचदा व्यक्त होण्यासाठी त्या निसर्गातील पाने, फुले, चांदणे, पाऊस, ढग यात दिसणाऱ्या प्रतीकांचा वापर करतात. हा त्यांचा पहिला कवितासंग्रह असला, काही नावीन्याच्या खुणा असल्या तरी मनाला भुरळ घालतील अशा निरोप, नाही कसे म्हणू?, उत्सव, तू असाच असतोस, माझ्यातलं मीपण सारख्या अनेक कविता “मनाचे सोहळे’ या कवितासंग्रहात आहेत.
तुला आठवायला
हल्ली निमित्त लागत नाही
तशी बरीच नक्षत्र असतात
तुझ्या आठवणींची
यासारख्या ओळी नक्कीच आपलं लक्ष वेधून घेतात. त्यामुळेच हा कवितासंग्रह वाचताना वाचकही मनातल्या मनात “मनाचे सोहळे’ साजरे करत राहतो.