महाराष्ट्रातील प्रास्तावित प्रकल्प गुजरातला हलवण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. शिंदे-फडणवीस यांच्या विरोधात विरोधकही आक्रमक झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर, ते केवळ गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागतात, संपूर्ण देशाचे पंतप्रधान म्हणून वागत नाहीत, असा आरोप गेल्या आठ वर्षांत अनेक वेळा केला गेला आहे. मग अगदी न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमधील कार्यक्रमात गुजराथी भाषेचा किंवा गरबा नृत्याचा बोलबाला असेल किंवा मुंबईहून अहमदाबादला बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा करताना असेल त्यात गुजरातचं हित जपणं हेच त्यांचं आद्यकर्तव्य आहे असं वाटतं. मुख्यमंत्री असतानाही ते गुजरातच्या प्रादेशिक अस्मितेलाच जास्त महत्त्व द्यायचे आणि पंतप्रधान बनल्यानंतर तर कुठल्याही नवीन प्रकल्पासाठी किंवा इतर देशांच्या नेत्यांच्या भेटी असोत गुजरात हाच मोदींसाठी पहिला चॉइस असतो. एक प्रकारे पंतप्रधान बनल्यानंतरही ते “आपणु गुजरात आगवू गुजरात’ (आपला गुजरात पुढारलेला गुजरात) या मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे वागतात, असं म्हणावसं वाटतं.
खनिकर्म क्षेत्रातील बडी कंपनी असलेली वेदांत आणि फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान उत्पादन व सेवा निर्माण करणारी कंपनी. अंदाजे, जगात वापरल्या जाणाऱ्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे हे फॉक्सकॉनशिवाय उत्पादित होऊ शकत नाहीत.”फॉक्सकॉन’ यांनी सेमीकंडक्टर उत्पादित करण्यासाठी प्रकल्प सुरू करायचे ठरवले होते आणि त्यासाठी पुण्याजवळील तळेगाव या भागात या प्रकल्पासाठी जागा आणि इतर सुविधा देण्याची तयारीही दर्शविली होती. हा प्रकल्प मिळविण्यासाठी ज्या दोन-तीन राज्यांत स्पर्धा होती त्यात गुजरात कुठेही नव्हता. त्या स्पर्धेत होती महाराष्ट्राबरोबरच दक्षिणेकडची दोन राज्यं. पण महाराष्ट्रात सत्तांतर घडवलं गेलं आणि अचानक स्पर्धेत नसतानाही गुजरात प्रकल्प आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झाला. हा सगळा बदल घडला अर्थात मोदींच्या गुजरात प्रेमामुळेच!
आता टीकेनंतर फॉक्सकॉनचा नवा प्रकल्प महाराष्ट्रात येईल अशी सारवासारव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून केली असली, तरीही त्याला अर्थ नाही. वेदांत-फॉक्सकॉनचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनीसुद्धा आपण नवा प्रकल्प महाराष्ट्रात आणू ही सारवासारव केंद्र सरकारच्या सांगण्यावरून केलेली दिसते. कारण या घटनेचा फायदा शिवसेना आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत घेऊ शकतात याची कल्पना आल्यामुळेच ही राजकीय सारवासारव केली जात आहे. कारण मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देणारा एक प्रकल्प आधीच केंद्र सरकारच्या कृपेमुळे गुजरातला गेला आहे.
अहमदाबाद जिल्ह्यात एक हजार एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी “वेदांत’ची गुंतवणूक 60 टक्के असेल, तर “फॉक्सकॉन’ची गुंतवणूक 40 टक्के असणार आहे. या प्रकल्पातून पुढील दोन वर्षांत सेमीकंडक्टरचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल, असं सांगितलं जातं. एकूण दीड लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्या कारणाने महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा उपेक्षा आली आहे. याला कारण अर्थात महाराष्ट्रात घडलेलं सत्तांतर! शिवसेनेतून फुटून निघालेले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साह्याने या अवाढव्य प्रकल्पाची गाडी तळेगावऐवजी अहमदाबाद जवळील धोलेराकडे वळवली, ती अर्थात मोदींच्या गुजरात प्रेमामुळे!
फॉक्सकॉन प्रकल्पावरून महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून वेदांत-फॉक्सकॉनला 39 हजार कोटी रुपयांची सवलत देण्यात आली होती. सेमीकंडक्टर चीन आणि तैवान येथून आयात केले जातात. या दोन्ही देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक सवलत योजना आणली होती. याचा फायदा घेऊन सेमीकंडक्टर उत्पादन करण्यासाठी वेदांत-फॉक्सकॉन यांनी संयुक्त अर्ज केला आहे. फॉक्सकॉन ही बहुराष्ट्रीय कंपनी फॉर्च्युन 500 च्या लिस्टमध्ये 22व्या नंबरची कंपनी आहे. फॉक्सकॉन ही मुख्यत्वे खूप जास्त विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन करते.
फॉक्सकॉनचे आतापर्यंतचे मुख्य कामकाज हे तैवान व चीनमधल्या कंपन्यांमधून चालायचे. मागच्या काही वर्षांत निर्माण झालेल्या अमेरिका-चीन-तैवान वादाचा परिणाम स्वरूप फॉक्सकॉनसारख्या अनेक कंपन्या पुढचा विस्तार चीनच्या बाहेर करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र सरकार बेंगलोर-पुणे-मुंबई महामार्गावर तळेगावच्या जागेवर ही जागा देणार होते. येथे बेस्ट कनेक्टिव्हिटी, कुशल कामगार मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुण्याचं विमानतळ, आयएनपीटी पोर्ट बंदर ही सारी व्यवस्था खूप जवळची आहे. तरीही ही कंपनी बळजबरीने गुजरातमधील धोलेरा येथे हलविण्यात आली. या भागात पुरेशी आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी मुंबई-पुण्याच्या तुलनेत नाहीच तसाच कुशल कामगारांची वानवाही भासेल.
प्रस्तावित धोलेरा स्मार्ट सिटी सुरुवातीपासूनच वादात आहे. पण अशाही परिस्थितीत आपणू गुजरातला आगवू गुजरात करण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी चंग बांधला आहे हेच दिसतं!