लोकसभा निवडणुका दीड एक वर्षावर येऊन ठेपल्या असल्याने विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे हे खरे; मात्र विरोधकांचे घोडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊ शकेल, असा पंतप्रधानपदाचा तगडा उमेदवार कोण या मुद्द्यापाशी अडले आहे.
यूपीए सरकारचा नाकर्तेपणा आणि मोदींच्या प्रचाराचा झंझावात यामुळे मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्तेत आणून दाखविले. तेव्हापासून विरोधक ऐक्याच्या वल्गना करीत आहेत. मात्र, विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार नेमका कोण, हा तिढा विरोधक सोडवू शकलेले नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे विरोधकांमधील एकजुटीच्या तटबंदीचा अभाव. साहजिकच अगोदरच पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केला तर आहे त्या एकजुटीलाही तडे जाण्याची भीती बहुधा विरोधकांना सतावत असावी. त्यामुळे आता 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असतानाही विरोधक या मुद्द्यावर चाचपडताना दिसतात आणि तेच नेमके मोदी आणि भाजपच्या पथ्यावर पडते. भाजप ही लढत भाजप विरुद्ध विरोधी पक्ष अशी न करता मोदी विरुद्ध कोण? अशी करत आली आहे आणि त्या कोण या प्रश्नाचे ठोस उत्तर विरोधक देऊ शकत नसल्याने मोदींना बाजी मारण्याची संधी मिळते आहे.
विरोधकांपाशी आता अवधी कमी आहे. मात्र अशावेळीही विरोधकांची एकजूट करू पाहणाऱ्या नेत्यांनी एका मागून एक आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही अशी विधाने करावीत हे आश्चर्यकारक आहे. याचे कारण हा मुद्दा जितका प्रलंबित ठेवला जाईल तितका तो अधिकच जटिल बनेल याची जाणीव विरोधकांनी ठेवावयास हवी. त्याचे आता तरी प्रत्यंतर येताना दिसत नाही. बिहारमध्ये भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलाशी (राजद) घरोबा करणारे मुख्यमंत्री नितीश कुमार हे विरोधकांचे पंतप्रधानपदाचे सामायिक उमेदवार असतील अशी शक्यता व्यक्त होत होती. किंबहुना 2013 साली भाजपने मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले तेव्हा नितीश कुमार यांनी त्यास विरोध केला होता आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) रामराम ठोकला होता. तेव्हापासून आजतागायत नितीश कुमार यांनी अनेकदा राजकीय कोलांटउड्या मारल्या असल्या तरीही आता पुन्हा ते राजदबरोबर गेले आहेत. स्वच्छ प्रतिमा, कारभाराच्या बाबतीत चांगली कामगिरी, विरोधकांमध्ये स्वीकारार्हता आणि केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळचा प्रशासकीय अनुभव यामुळे नितीश कुमार हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे गृहीत धरण्यात येत होते.
ममता बॅनर्जी याही या स्पर्धेत असल्या तरी त्यांची प्रतिमा ही अधिक आक्रमक नेत्याची आहे आणि मुख्य म्हणजे डाव्या पक्षांचा त्यांना कितपत पाठिंबा राहील याची साशंकता आहे. तेव्हा नितीश कुमार या स्पर्धेत आघाडीवर असावेत असे वाटत असताना आणि त्यांनी विविध भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटींचा लावलेला धडाका पाहता ते यासाठी उत्सुक असावेत अशीच चर्चा होती. या चर्चेला छेद दिला तो जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी. नितीश कुमार पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत, असे वक्तव्य त्यांनी केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांची भेट घेतल्यानंतर नितीश यांनी स्वतःही आपली भूमिका स्पष्ट केली आणि “आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार नाही आणि तशी आपली इच्छाही नाही’ असे त्यांनी म्हटले. मात्र, तरीही विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटींचा त्यांनी लावलेला झपाटा पाहता ते आपली खरी भूमिका गुलदस्त्यात ठेवू इच्छितात का, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक. मात्र, तूर्तास तरी त्यांनी स्वतःस या स्पर्धेपासून दूर ठेवले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पवार हे विरोधकांच्या ऐक्यासाठी मोठे काम करू शकतात; पण ते पंतप्रधानपदाचे उमेदवार नव्हते आणि नाहीत असे म्हटले आहे. वास्तविक पवारांचे नाव राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत होते आणि ममता बॅनर्जी यांनी त्यासाठी पुढाकार देखील घेतला होता. पण पवारांनी स्वतःच त्यास नकार दिला आणि अखेरीस यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर विरोधकांच्या ऐक्याला तडे गेले हेही विसरता येणार नाही. आताही नितीश कुमार आणि पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील तर विरोधकांचे उमेदवार कोण हा प्रश्न अधिकच गंभीर बनतो. याचे कारण द्रमुक, टीआरएस, जेडीएस, समाजवादी पक्ष, राजद असे पक्ष भाजपला प्रादेशिक स्तरावर कदाचित तुल्यबळ लढत देत असतीलही. मात्र त्यांच्या नेत्यांची प्रतिमा ही राष्ट्रीय नेत्याची नाही; ना आपापले राज्य वगळता अन्य राज्यांत त्यांची काही ताकद आहे; ना देशभरच्या मतदारांशी संवाद साधण्याची कला त्यांच्यापाशी आहे. तेव्हा अखिलेश यादव यांच्यापासून स्टॅलिन यांच्यापर्यंत अनेक नेते विरोधकांत असले आणि राज्यस्तरावर ते भाजपला लढत देत असले तरी पंतप्रधानपदाचा तगडा उमेदवार ठरेल असा चेहरा त्यांच्यातील कोणी असेल असे आता तरी चित्र नाही.
तेव्हा राहतात दोनच पक्ष- आम आदमी पक्ष (आप) आणि कॉंग्रेस. आपने दिल्ली पाठोपाठ पंजाबात सत्ता मिळविली आहे आणि आता गुजरात, हिमाचल यांना भाजपने लक्ष्य केले आहे. भाजपला गुजरातेत कॉंग्रेसपेक्षा आपची धास्ती अधिक आहे हेही स्पष्ट आहे. “मेक इंडिया नंबर वन’ सारख्या घोषणा करून अरविंद केजरीवाल हे आपली प्रतिमा एका राष्ट्रीय नेत्याची करीत आहेत. केजरीवाल हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे सूतोवाच त्या पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनीही केले आहे. मात्र, आपने कितीही विस्तार केला तरी भाजपच्या जगड्व्याळ संघटनेसमोर देशभर आपचा प्रभाव राहणे तूर्तास तरी असंभव. त्यातच आता आपल्या “मोफत विजे’सारख्या योजना दिल्लीत केजरीवाल सरकार गुंडाळू पाहात आहे. तेव्हा ज्या “दिल्ली मॉडेल’चा गवगवा करून केजरीवाल आपचा विस्तार करू पाहात आहेत तोच डळमळाला तर राष्ट्रीय स्तरावर केजरीवाल यांना समर्थन कसे मिळणार हा प्रश्न. उरली कॉंग्रेस. त्या पक्षाने भारत जोडो यात्रा सुरू केली आणि तीस प्रतिसाद मिळतो आहे अशी वृत्ते येत असतानाच गोव्यात कॉंग्रेसचे आठ आमदार भाजपच्या तंबूत शिरले. त्या पक्षाचा अध्यक्ष कोण याचा उलगडा पुढील महिन्यात होईल. तेव्हा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हे निश्चित करण्यास त्या पक्षाकडे तूर्तास ना उसंत आहे ना अनुकूल परिस्थिती.
एकूण नितीश कुमार यांच्यापासून पवारांपर्यंत सगळेच पंतप्रधानपदाच्या उमेदवारीपासून स्वतःस अलिप्त ठेवत असताना, कॉंग्रेसला अध्यक्ष नसताना आणि केजरीवाल जरी उत्सुक असले तरी त्यांच्या पक्षाच्या विस्ताराला मर्यादा असताना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात पंतप्रधानपदाचा चेहरा कोण, हा मुद्दा आतातरी अधांतरी आहे. निवडणुका उंबरठ्यावर आल्यावरही विरोधक या प्रश्नाचे उत्तर शोधू शकत नसतील तर भाजपविरोधात केवळ आगपाखड करण्यावरच त्यांना समाधान मानावे लागण्याचा संभव अधिक!