नवी दिल्ली – पाकिस्तानविरुद्धच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर गटातील लढतीत असिफ अलीचा झेल सोडल्यामुळे अजूनही टीकेचा धनी बनलेला भारताचा नवोदित वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपण त्या रात्री झोपू शकलो नाही, अशा शब्दांत परिस्थितीचे वर्णन केले.
हा सामना आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा होता. ऐन मोक्याच्या क्षणी माझ्याकडून झेल सुटला. त्यावेळी मला कर्णधार रोहित शर्मासह अन्य खेळाडूंकडे पाहण्याची हिंमतही झाली नाही. मी खूप घाबरलो होतो तसेच रोहितही माझ्यावर चिडला होता. मात्र, त्यानंतर ड्रेसिंगरूममध्ये त्याच्यासह सर्व खेळाडूंनी मला धीर दिला व प्रोत्साहनही दिले, असे अर्शदीप म्हणाला.
दरम्यान, अर्शदीप सिंगने पाकिस्तानचा फलंदाज असीफ अलीचा मोक्याच्या क्षणी झेल सोडला. त्यावरून काही व्यक्तींनी सोशल मीडियावर अर्शदीपबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यावरून देशातील वातावरण बिघडवण्यात मदत करु नका, असे ताशेरे ओढत केंद्र सरकारने विकिपीडीयाला नोटीस पाठवली होती.
अर्शदीपची निवड योग्य
अर्शदीपची विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली असून बीसीसीआयने म्हटले आहे की, आयपीएल स्पर्धेत अफलातून कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळालेल्या नवोदित वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आशिया करंडकातही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्याचे यॉर्कर तसेच इनस्विंग चेंडू दिग्गज फलंदाजांनाही अडचणीत टाकणारे ठरले होते. त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियात तो निश्चितच यशस्वी ठरेल, असे मतही बीसीसीआयने व्यक्त केले आहे.