मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करुन हे सरकार आले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरगुती दौऱ्यावर सुप्रिया सुळेंनी टोला मारला होता. त्यांच्या या टीकेला आता भाजपयाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. भाजापाने मराठा कुटुंबातील एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केले, हे पवार कुटुंबियांचे दुख आहे, अशी टीका पडळकर यांनी सुळेंवर केली आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर दिले आहे. “महाराष्ट्रातील पवार कुटुंबीय सोडून कोणी मोठं नाही, हे सुप्रिया सुळेंना वाटतं. शरद पवार राज्यात काहीतरी राजकीय बदल करु शकतात याला एकनाथ शिंदेंनी छेद दिला. अजित पवारांनी सुद्धा बंड केलं होते. मात्र, त्यांच्यासह २ आमदार राहिले नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यासमवेत ५० आमदार राहिले. त्यांच्यापोटातील दुखणं वेगळं आहे. ते बोलत आहेत वेगळं आहेत,” असा टोमणाही पडळकर यांनी सुप्रिया सुळेंना मारला आहे.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगल्या प्रकारे काम करत आहेत. जनतेचाही त्यांना पाठिंबा आहे. अडीच महिन्यात घेण्यात आलेले निर्णय अडीच वर्षांतही झाले नाहीत. मागील सरकारमधील मुख्यमंत्री दोन वर्षे मंत्रालयात आले नाही. मात्र, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रात्रंदिवस जनतेसाठी वेळ देत आहेत. गणपतीसाठी ते घरी गेले तर, तुम्हाला का वाईट वाटत आहे,” असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळेंना विचारला आहे.