मुंबई – आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज्यभरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे बंडखोरी केल्यानंतर यासाठी याआधी नारायण राणे, छगन भुजबळ यांच्या बंडखोरीचा देखील दाखला दिला जातो. आणि राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केल्याच्या घटनेचा देखील राजकीय विश्लेषकांकडून उल्लेख केला जातो. या तुलनेवर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज ठाकरे म्हणाले,’माझं बंड नव्हतं म्हणून मी बाहेर पडलो, तेव्हा बाळासाहेबांनी मला मिठी मारली. ते पुढे म्हणाले, मी आजपर्यंत ती गोष्ट तुम्हाला कधी बोललो नाही. मी मातोश्रीवर गेलो तेव्हा बाळासाहेबांनी मला बोलवलं. माझ्यासमोर अलिंगनासाठी हात पसरले. मला मिठी मारली आणि म्हणाले ‘आता जा’. त्यांना समजलं होतं मी जाणार आहे.. त्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलेलो नाही. कुठल्याही दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही. तुमच्या विश्वासावर नवा पक्ष उभा केला. आजपर्यंत आपल्या पक्षानं जेवढी आंदोलनं केली. इतर कोणत्याही राजकीय पक्षानं इतकी आंदोलनं केली नाहीत आणि यशस्वी केली नाहीत.’ असं म्हणत त्यांनी आपलं मत मांडलं आहे.