भोपाळ – आमिर खानचा लालसिंह चढ्ढा या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात असताना शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. दरम्यान, आमिरने प्रेक्षकांची माफीही मागितली आहे. मात्र त्यावरून मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी त्याच्यावर टीका केली आहे. लोकांची माफी मागण्याची वेळ यावी असे कामच का करतो असा सल्ला त्यांनी आमिरला दिला आहे.
आमिर खानसह काही कलाकार, निर्माता आणि दिग्दर्शक एका धर्माला सॉफ्ट टार्गेट बनवून असे चित्रपट करतातच कशाला की त्यांनी नंतर प्रेक्षकांची माफी मागावी लागते अशी विचारणा मिश्रा यांनी केली आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माची खिल्ली उडवण्याचा अथवा उपहास करण्याचा प्रकार चित्रपटात असता कामा नये याची नेहमी काळजी घेतली गेली पाहिजे.
माफी मागण्याची वेळ येऊ नये याची या कलाकारांनी दक्षता घ्यावी असे माझे त्यांना निवेदन आहे. कोणत्याही धर्माची खिल्ली उडवण्याच्या प्रकारापासून या मंडळींनी लांबच राहावे. मला आशा आहे की हे लोक यापुढे याचा विचार करतील असे मिश्रा यांनी म्हटले आहे.