महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युतीचे सरकार स्थापन केल्याचा आनंद भाजपाचे नेते व्यक्त करत असतानाच बिहारमध्ये मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे नेते नितीशकुमार यांनी भाजपला बाजूला सारून राष्ट्रीय जनता दलासोबत सत्ता स्थापन केली आहे. साहजिकच “ऑपरेशन लोटस’ या नावाखाली जे गेल्या काही वर्षांमध्ये देशात सुरू होते त्या ऑपरेशनला नितीशकुमार यांनी आव्हान दिल्याचे दिसून येते.
जो डोस आतापर्यंत भाजपचे नेते इतर छोट्या पक्षांना पाजत होते तोच डोस नितीशकुमार यांनी भाजपला पाजला आहे. लोकसभा निवडणूक दोन वर्षांनी होणार असल्याने अशा प्रकारची भूमिका घेण्यामागे निश्चितच नितीशकुमार यांची काहीतरी रणनीती आहे. त्या रणनीतीचा एक भाग म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी मैत्री केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दलाने चांगली कामगिरी करून सर्वात जास्त जागा मिळवल्या होत्या तरीसुद्धा राष्ट्रीय जनता दलाला सत्तेवर येता आले नव्हते. कारण, नितीशकुमार यांनी मैत्रीचा हात पुढे केला नव्हता. उलट त्यांनी त्यावेळी भाजपाच्या साथीने सरकारची स्थापना केली.
खरे तर नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड या पक्षाला सर्वात कमी जागा मिळाल्या होत्या तरीसुद्धा भाजपने या राज्यांमध्ये आपली सत्ता असावी या हेतूने नितीशकुमार यांना पाठिंबा देऊन सत्तेत वाटा मिळवला होता. पण दोन-अडीच वर्षांच्या कालावधीमध्येच पुन्हा एकदा काहीतरी फिसकटले असून नितीशकुमार यांना लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाचा सहारा घ्यावा लागला आहे. खरेतर राष्ट्रीय जनता दलाकडे जास्त जागा असल्याने ते मुख्यमंत्रिपदावर दावा सांगू शकतात; पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे या एकाच हेतूने राष्ट्रीय जनता दलाने तीसुद्धा तडजोड केली असून मुख्यमंत्रिपद नितीशकुमार यांच्याकडेच ठेवले आहे. गेल्या वीस ते बावीस वर्षांच्या कालावधीमध्ये नेहमीच नितीशकुमार यांनी कधी भाजपशी मैत्री केली आहे, तर कधी ही मैत्री तोडून इतर पक्षांसोबत मैत्री केली आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय जनता दलासोबत सत्तेत असतानाही त्यांनी अचानकच राजीनामा देऊन भाजपसोबत घरोबा केला होता. त्याचीच पुनरावृत्ती झाली असून यावेळी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रीय जनता दलासोबत घरोबा केला आहे.
नितीशकुमार यांनी अशा प्रकारची भूमिका घेण्यामागे विविध प्रकारची कारणे जरी सांगण्यात येत असली तरी त्यांनी एका विशिष्ट रणनीतीच्या आधारे ही भूमिका घेतली आहे, हे उघड आहे. केंद्रातील भाजपा सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना नितीशकुमार यांनी विरोध दर्शवला होता. “अग्निवीर’सारख्या योजनेलाही विरोध दर्शवला होता. बिहारमध्ये सर्वात जास्त दंगे याच विषयावरून झाले होते. तेव्हा भाजपने नितीशकुमार यांना राज्य व्यवस्थित सांभाळावे अशा प्रकारच्या सूचनाही केल्या होत्या. बिहारमधील विधानसभेच्या सभापतींबरोबरही नितीशकुमार यांचे वादविवाद होते. केंद्रातील सत्तेमध्ये समसमान वाटा देण्याचे आश्वासन भाजपने पाळले नाही, हासुद्धा एक विषय आहे. ही सर्व कारणे सांगितली जात असली तरी आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधी पक्षांचा एक चेहरा म्हणून नरेंद्र मोदी यांच्यासमोर उभे राहण्याच्या उद्देशाने नितीशकुमार यांनी हे पाऊल टाकले आहे, हे उघड आहे.
बिहारमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांचे महागठबंधन सरकार सत्तेवर आल्यामुळे इतर राज्यांतील विरोधकांनासुद्धा प्रोत्साहन मिळणार आहे. नितीशकुमार यांच्या निमित्ताने मोदींना आव्हान देणारा एक चेहरा समोर येणार आहे. इतर राज्यांमधील नेते थेटपणे मोदी यांचे आव्हान स्वीकारायला तयार नाहीत किंवा त्यांची तशी मानसिकता दिसत नाही. नितीशकुमार यांनी यापूर्वी अनेक वेळा भाजपला थेट विरोध केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाला आव्हान द्यायचे असेल तर आपला चेहरा राष्ट्रीय चेहरा म्हणून समोर येण्याची गरज आहे. या भूमिकेतूनच नितीशकुमार यांनी हा निर्णय घेतला आहे, हे उघड आहे. भाजपाने ज्याप्रकारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षामध्ये फूट पाडून शिवसेनेचे अस्तित्व संपवण्याचे काम सुरू केले तशाच प्रकारची कुणकुण नितीशकुमार यांना बिहारमध्येही लागली होती.
भाजपाने बिहारमध्ये अशाप्रकारे ऑपरेशन करायला सुरुवात करण्यापूर्वीच नितीशकुमार यांनी भाजपला बाय बाय करून राष्ट्रीय जनता दलाबरोबर घरोबा केला आणि भाजपला जोरदार धक्का दिला. भाजपची जी रणनीती गोवा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये यशस्वी झाली होती ती बिहारमध्ये अंमलात येण्यापूर्वीच नितीशकुमार यांनी लोकशाही आघाडीतून बाहेर पडून महागठबंधनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. बिहारमध्ये आजही लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे वर्चस्व आहे हे गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सिद्ध झाले होते. लालूप्रसाद यादव यांची दोन्ही मुले त्यांचा पक्ष व्यवस्थितपणे सांभाळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या साथीने जास्तीत जास्त जागा जिंकून केंद्रीय स्तरावर आपले नेतृत्व चमकवण्याचा विचार नितीशकुमार करत आहेत, हे उघड आहे. अर्थात, भाजपची साथ सोडून ज्या राष्ट्रीय जनता दलासोबत नितीशकुमार यांनी घरोबा केला आहे त्या पक्षातील सध्याचे तरुण नेते तेजस्वी यादव हेसुद्धा महत्त्वाकांक्षी आहेत, हे नितीशकुमार यांना विसरून चालणार नाही.
नितीशकुमार यांनी काही वर्षांपूर्वी आपली साथ अचानक सोडून भाजपसोबत घरोबा केला होता, हा इतिहासही राष्ट्रीय जनता दल सहजासहजी विसरेल असे नाही; पण सध्या भाजपला पर्याय निर्माण करणे आणि भाजपला आव्हान देणे हा एक कलमी कार्यक्रम असल्याने हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. इतर अनेक राज्यांमध्ये भाजपचा प्रभाव वाढत असताना आणि प्रादेशिक पक्षांना कमकुवत करून तेथे सत्ता स्थापन करण्याची रणनीती भाजप प्रभावीपणे राबवत असताना बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये मात्र भाजपला अशाप्रकारे धोबीपछाड देऊन नितीशकुमार यांनी निश्चितच राष्ट्रीय स्तरावर आपले नेतृत्व सिद्ध करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. किंबहुना बिहारमधील घडामोडी हा त्यांच्या रणनीतीचा एक भाग मानावा लागतो.