पाटणा – बिहारचे राजकारण अचानक तापले आहे. येत्या काही तासांत राज्यातील संख्याबळाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचे पारडे जड असल्याचे वाटत असतानाच त्यांच्या पक्षाच्या 18 आमदारांवर अपात्र ठरवले जाण्याची टांगती तलवार आहे.
विधानसभा अध्यक्षांशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप या 18 आमदारांवर होता. त्याकरता एक समितीही स्थापन करण्यात आली होती. या शिस्तपालन समितीचा अहवाल विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांच्याकडे आला आहे. त्या अहवालात या आमदारांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना अपात्रही केले जाऊ शकते. अध्यक्ष काहीतरी मोठाच निर्णय घेतील अशी चर्चा आहे.
सध्या बिहारमध्ये राजदचे 79 आमदार आहेत. तर भारतीय जनता पार्टीचे 77 आमदार आहेत. जर या 18 आमदारांना अपात्र ठरवले गेले तर भाजप हा राज्यातील सगळ्यांत मोठा पक्ष ठरेल. तसे झाले तर राज्यपालांकडे सगळी सूत्रे जातील व कोणाला बोलवायचे याचा निर्णय तेच घेतील.