ओंकार दळवी
जामखेड – नगरपालिकेच्या नवीन प्रभाग रचनेनुसार आरक्षणाची सोडत काढण्यात येऊन त्याची अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, सरकारने जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका या जुन्या प्रभाग रचनेनुसार होणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. यामध्ये नगर परिषदेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला नसला, तरी पालिकेच्या प्रभागरचनेवरून इच्छुकांसह नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला पहावयास मिळत आहे.
जामखेड नगरपरिषदेची मुदत संपल्याने त्या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. या नगर परिषदेमध्ये नव्याने प्रभागरचना करण्यात आली असून, त्यानुसार मतदार याद्या आणि आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. आरक्षण सोडतीसंदर्भात अंतिम अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुका येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीसंदर्भात हालचाली सुरू होताच नगरपरिषदेच्या राजकारणात नशीब अजमावण्यासाठी उत्सुक असलेल्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांच्या तयारीला वेग आला होता, तर विविध पक्षांची नेतेमंडळीही नगरपालिका काबीज करण्यासाठी सरसावलेली होती.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका 2017च्या प्रभाग रचनेनुसार घेण्यात याव्या असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जुन्या प्रभाग रचनेनुसार पार पडणार असल्याने नव्या प्रभाग रचनेनुसार करण्यात आलेल्या मतदार याद्या, प्रभागरचना आणि आरक्षण या सर्वांना स्थगिती मिळाली आहे. या निर्णयामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकीसंदर्भात उल्लेख करण्यात आलेला नाही किंवा त्यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेमध्येही तसा उल्लेख नाही. असे असले तरी नगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भातही असा निर्णय होणार की, नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणूक पार पडणार असा संभ्रम आता इच्छुक उमेदवार आणि विविध पक्षांच्या नेतेमंडळींमध्ये निर्माण झालेला दिसत आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्यांच्या प्रभागात सुरू केलेल्या भेटीगाठी आणि तयारी गेल्या दोन दिवसांत मंदावलेली दिसत आहे.
संधी हुकलेल्यांच्या आशा पल्लवित
नगर परिषद प्रभाग रचना आणि आरक्षण या दोन्ही बाबी पार पडल्या आहेत. त्यात बऱ्याच इच्छुकांच्या इच्छेप्रमाणे आरक्षण न निघाल्याने त्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना निवडणुकीत नशीब आजमविण्याची संधी मिळणार नाही. मात्र, गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या या संभ्रमामुळे संधी हुकलेल्यांना पुन्हा एकदा संधी मिळेल असे वाटत असल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
आरक्षण सोडतीकडे लक्ष
नगरपालिका निवडणुकीचे वारे आता तेजीत वाहू लागले आहेत. त्यातच आरक्षण सोडत निघून त्याची अंतिम अधिसूचनाही काढण्यात आली आहे. मात्र, यंदा नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष आहे. या सोडतीवर इच्छुकांची स्वप्ने अवलंबून आहेत हे विशेष!
नगरपरिषदेबाबत संभ्रम
राज्यात नुकत्याच झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यात तालुक्यातील सर्व प्रमुख पक्षांनी या निवडणुका गांभीर्याने घेतल्या असून, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, अशात जिल्हा परिषदेसंदर्भात आलेल्या नव्या निर्णयाने नगरपरिषदेबाबत संभ्रम तयार झाला असून, पक्षाचे पदाधिकारीही त्यात अडकले आहे.