कोपरगाव – मासिक पाळी या विषयावर संकोचाने बोलले जाते. त्यावर चर्चा होत नाही. त्याबाबत बऱ्याच अंधश्रद्धा व गैरसमजूती आहे. पण या सर्वांना छेद देण्याचे काम कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील चांदगुडे दांपत्यांनी केले. आपल्या लेकीचा सन्मान व्हावा, तिच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होऊ नये, समाजाचा मासिक पाळीबाबतचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, यासाठी चांदगुडे दाम्पत्याने मासिक पाळी महोत्सवाचे आयोजन नाशिक येथे केले. या क्रांतिकारी उपक्रमाची समाज माध्यमातून राज्यभर चर्चा होत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे व ऍड. विद्या चांदगुडे यांची मुलगी यशदा हिला प्रथमच मासिक पाळी आली. त्यानिमित्ताने नाशिक शहरातील महामार्गावरील एका हॉटेलमध्ये तिच्या प्रथम मासिक पाळीच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
“आता माझी पाळी, मीच देते टाळी’ हे घोषवाक्य घेऊन उपक्रम राबवण्यात आला. मासिक पाळी या विषयावर समाजबंध संस्थेचे कल्पेश जाधव यांनी व्याखानातून जनजागरण केले. मासिक पाळी या विषयावर संदेश देणारी गाणी व कविता म्हटल्या गेल्या. संत वाड्मयातील रचनांमध्ये सापडणाऱ्या अभंगांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. मासिक पाळी या विषयावर डॉ. टी.आर. गोराणे, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे, जयश्री पाटील, ऍड. विद्या चांदगुडे, प्रथमेश वर्दे आदींनी सहभाग नोंदवला. या वेळी मासिक पाळी या विषयावर असलेली “प-पाळीचा’ ही पुस्तिका वितरीत करण्यात आली.
उपस्थितांनी मनातील अंधश्रद्धा दूर झाल्याची भावना व्यक्त केली. सूत्रसंचालन किरण चांदगुडे यांनी केले तर आभार यांनी ऍड. समीर शिंदे यांनी मानले. स्नेहजनांनी आणलेल्या सॅनेटरी पॅडचे वस्तीतील गरजु मुलींना वाटप करण्यात आले.