मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आज अखेर मुहूर्त मिळाला आहे. छोटेखानी पद्धतीने आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात २० ते २२ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ज्यांना मंत्रिमंडळात तात्पुरती संधी मिळेल ती लखलाभ असो असे म्हणत शिंदे गटातील आमदारांविषयी मोठा दावा केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत म्हणाले, “४० जणांना मंत्रीपदाचं आमिष दाखवून शिवसेनेपासून दूर घेऊन गेले आहेत. त्याच्यापैकी ८-१० जणांचा नंबर लागेल. इतर जण एकमेकांच्या उरावर बसायला मोकळे झाले आहेत. त्यामुळेच पाय खेचणं सुरु झालं आहे. काहीजण आमच्या संपर्कात येण्यास सुरुवात झाली आहे,” असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.
“संपर्कात असले तरी आम्ही कोणावारही दबाव टाकलेला नाही. आमच्याकडे पुन्हा येण्यासाठी त्यांना कोणतंही आमिष दाखवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं नाही. ज्यांना मनापासून जायचं आहे ते गेले असल्याने जास्त मनधरणी करायची नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. नितीन देशमुख, कैलास पाटील यांच्याप्रमाणे ज्यांना वाटत असेल, त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत,” असे विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
“या सरकारला भविष्य नाही. सुप्रीम कोर्टात अपात्रतेसंदर्भात जे प्रकरण आहे, त्यामध्ये आम्हाला नक्कीच न्याय मिळेल. देशातील सर्व कायदेतज्ज्ञ हेच सांगत आहेत. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे,” असे विनायक राऊत यांनी सांगितले आहे.