नवी दिल्ली – राज्यात झालेल्या सत्ता संघर्षावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याप्रकरणी उद्या, सोमवारी होणारी सुनावणी 12 ऑगस्ट रोजी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर काय होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. मात्र, आता या सुनावणीची पुढची संभाव्य तारीख ही 12 ऑगस्ट असल्याचे समजते. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर संभाव्य तारीख 12 ऑगस्ट दाखवण्यात येत आहे.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने ऍड. कपिल सिब्बल, ऍड. अभिषेक मनु सिंघवी, तर शिंदे गटाकडून ऍड. हरीश साळवे हे न्यायालयात युक्तिवाद करत आहेत. तर निवडणूक आयोगाकडून ऍड. अरविंद दातार बाजू मांडत आहेत.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या खंडपीठासमोर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी 8 ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. पण, आता ही सुनावणी 12 ऑगस्ट रोजी म्हणजेच शुक्रवारी होणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, शुक्रवारी सुनावणीदरम्यान निकाल न लागल्या त्यानंतर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुट्ट्या आहेत. तसेच सरन्यायाधीशांच्या निवृत्तीची तारीखही 26 ऑगस्ट आहे. त्यामुळे सुनावणी लांबणीवर गेल्यास या प्रकरणात आता खंडपीठ हेच राहणार का? याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रातील हे सरकार बेकादेशीरपणे स्थापन झाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. शिवाय, आपणच शिवसेना असून आम्ही शिवसेना सोडली नसल्याचा दावा शिंदे गटाकड़ून करण्यात येत आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी युक्तिवादही झाले.
याबाबत 4 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने देखील आपली बाजू मांडली. तर शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाबाबत तुम्ही सध्या कुठलाही निर्णय घेऊ नका, असे निर्देश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यानंतर ही सुनावणी सोमवार, दि. 8 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता ही सुनावणी 8 ऑगस्टला होणार की 12 ऑगस्टला होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.