कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना “अल कायदा’चा म्होरक्या आयमान अल जवाहिरी याचा अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये खात्मा करण्यात आल्यामुळे जगाने सुस्कारा टाकला असेल.
जवाहिरी आणि ओसामा बिन लादेन यांनी अमेरिकेवरील 9-11च्या भयकारी अशा दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती. लादेनला 2 मे 2011 रोजी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे अमेरिकेच्या गुप्त मोहिमेत यमसदनास पाठवण्यात आले. लादेनच्या मृत्यूनंतर जवाहिरीच अल-कायदाचा नेता बनला. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून त्याने अमेरिकन नागरिकांवर ठिकठिकाणी हल्ल्यांचे कट रचले होते. ऑक्टोबर 2000 मध्ये एडनमधील अमेरिकी युद्धनौकेवर त्याने घडवलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 17 नौसैनिकांचा बळी गेला होता. केनिया आणि टांझानियामधील अमेरिकी दूतावासांवर 1998 मध्ये त्याने हल्ला घडवून आणला. त्याच्या आदल्याच वर्षी इजिप्तमधील लक्सर या शहरात विदेशी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यातही जवाहिरीचा हात होता आणि त्यात 62 जण ठार झाले होते. आमच्या नागरिकांना धोका निर्माण करणाऱ्यांपासून आत्मसंरक्षण करण्याबाबत अमेरिकन सरकार कायमच वचनबद्ध राहील. कितीही वेळ लागला, तरी अतिरेकी कुठेही लपला असला, तरी देशासाठी धोका ठरणारी व्यक्ती आम्ही शोधून काढून तिचा नायनाट करूच, असा पुकारा अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी केला आहे.
अमेरिकेच्या ऐतिहासिक घोडचुकांमुळे आंतरराष्ट्रीय दहशतवादास चालना मिळाली हे खरे असले, तरी निरपराध नागरिकांना ठार मारणाऱ्या अतिरेक्यांना व त्यांच्या प्रमुखांना नरकात पाठवण्याचा इरादा करून, तो पूर्णत्वास नेण्याची अमेरिकेची जिद्द कौतुकास्पदच आहे. जवाहिरी हा इजिप्तमधील प्रतिष्ठित कुटुंबातील होता आणि त्याचे आजोबा कैरोच्या अल अजहर विद्यापीठात इमाम होते. जवाहिरी हा स्वतः शल्यविशारद होता. गरिबी व बेकारीमुळे असंख्य तरुण अतिरेकी बनतात हे खरे असले, तरी सुशिक्षित वर्गातही कट्टरतावाद असतो. अगदी महाराष्ट्रातही काही सुशिक्षित तरुण इसिस वा इंडियन मुजाहिदीनसारख्या संघटनांत भरती झाल्याची उदाहरणे आहेत. जवाहिरीने अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील सुरक्षित आश्रयस्थानांचा लाभ उठवत, भारतीय उपखंडात अल कायदाची शाखा स्थापन केल्याची घोषणा केली होती. जिहादचा झेंडा रोवण्यासाठी आणि भारतीय उपखंडात इस्लामी राजवट परत आणण्यासाठी त्याने अल-कायदा अल जिहादची स्थापना केली.
अफगाणिस्तानचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांच्याच काबूलमधील घरात जवाहिरीला आश्रय देण्यात आला होता आणि तेथेच अमेरिकेने हल्ला करून त्याचा मुडदा पाडला. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट पुन्हा प्रस्थापित झाली, तेव्हा ही राजवट पूर्वीसारखी क्रूर नाही, असा दावा केला जात होता. प्रत्यक्षात ती निर्दयी असून, सत्तांतराच्या वेळी पत्रकारांनाही त्याचा अनुभव आला आणि महिलांनादेखील. तालिबानी राजवट दहशतवादापासून हळूहळू लांब जाईल, अशी ज्यांना आशा वाटत होती ते मूर्खांच्या नंदनवनात राहात असल्याचे सिद्ध झाले आहे. अन्यथा गृहमंत्र्यानेच जवाहिरीला आसरा द्यावा, याचा दुसरा अर्थ काय निघतो?अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांनी, आपण शांततावादी असल्याचा भूलभुलैया निर्माण केला होता; परंतु त्यांच्याच कारकिर्दीत पाकिस्तानचे कट्टरतावादी अध्यक्ष झिया उल हक यांना अमेरिकेने प्रचंड लष्करी मदत केली. सोव्हिएत रशियाच्या कब्जात असलेल्या अफगाणिस्तानमधील मुजाहिदींना अमेरिका व पाकिस्तानने सर्व प्रकारची मदत केली. 1989 साली सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानमधून माघार घेतली; परंतु त्याच सुमारास अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्यातील शीतयुद्धाची समाप्ती झाली.
सोव्हिएत रशिया विस्कटल्यानंतर अमेरिकेचे प्राबल्य वाढले; परंतु अमेरिकेने केलेल्या “अन्यायाच्या’ विरोधात तालिबान, अल कायदा, इसिससारख्या संघटनांनी दहशतवादी धिंगाणा सुरू केला. 1990 ते 2000 पर्यंत जगातील दहशतवाद आशिया आणि आफ्रिका खंडांपर्यंत मर्यादित होता. 2000 नंतर अमेरिका आणि युरोप यांना लादेन व जवाहिरीसारख्या दहशतवाद्यांनी लक्ष्य बनवण्यास सुरुवात केली. जवाहिरीसारख्यांनी तर दहशतवादाला गडद धार्मिक रंग दिला आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांनी तेलाचे हितसंबंध राखण्यासाठी पश्चिम आशियातील इस्लामी देशांत ढवळाढवळ केली. त्याचा विरोध करण्यासाठी अल-कायदासारख्या दहशतवादी संघटना उदयास आल्या. अफगाणिस्तानात 1996 ते 2001 या काळात प्रथम तालिबानची राजवट आली. तेथील वांशिक गटांमध्ये असणाऱ्या संघर्षाचा फायदा तालिबानने घेतला. 2010 पर्यंत तालिबान पुरस्कृत दहशतवाद ठिकठिकाणी दिसून आला. मात्र 2011 मध्ये “अरब स्प्रिंग’ नावाने आखाती देशांत लोकशाही चळवळी सुरू झाल्या. पुढे या चळवळींचे रूपांतर वांशिक संघर्षात झाले. शिया-सुन्नी यांच्यात चकमकी होऊन, अनेक दहशतवादी संघटना स्थापन झाल्या.
2014 नंतर आयसिसने इराक व सीरियाच्या तीस टक्के भूमीवर कब्जा मिळवला होता. पॅरिस आणि ब्रसेल्समध्ये तिने भयंकर धमाके घडवून आणले. त्यानंतर अल-कायदा आणि इसिस यांच्यात संघर्ष सुरू झाला. एका संघटनेने एखादा बॉम्बस्फोट किंवा अतिरेकी हल्ला घडवून आणला, की दुसऱ्या संघटनेने त्यापेक्षाही भीषण हल्ला घडवून आणायचा, अशी स्पर्धा त्यांच्यात सुरू झाली. याचे प्रतिबिंब अफगाणिस्तान, पाकिस्तान व बांगलादेशात पडताना दिसले. आता जवाहिरी मारला गेल्यामुळे, दहशतवादविरोधी आंतरराष्ट्रीय मोहिमेस बळ मिळणार आहे. अर्थात, लादेनप्रमाणे जवाहिरीस “करिश्मा’ प्राप्त झाला नव्हता. अमेरिकेवरील हल्ल्यानंतर लादेन अफगाणिस्तानमधील डोंगराळ भागात लपल्याच्या बातम्या, तेथून त्याने अमेरिकेला दिलेले इशारे आणि जगभरातील अतिरेक्यांना तो देत असलेले प्रोत्साहन यामुळे त्याच्याभोवती एक वलय तयार झाले होते. परंतु लादेननंतर जवाहिरीने नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. तथापि इसिसच्या उदयानंतर अल-कायदाचा रंग फिका पडू लागला होता. लादेनचा मुलगा हमझा यालाही अमेरिकेने पकडून नेल्यानंतर जवाहिरीवरच जबाबदारी आली होती.
अमेरिकेपासून इंडोनेशियापर्यंत त्याने दहशतवादाचे “फ्रॅंचायसी मॉडेल’ विकसित केले होते. नवनवीन तरुणांची भरती करून घेण्यात तो यशस्वी झाला होता. भारताच्या दृष्टीनेही अल-कायदाचा धोका होताच. जगात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या भारतात आहे. तरीदेखील अल कायदाला भारतात तसे हातपाय पसरता आले नाहीत. गतवर्षी हुर्रियत नेते सय्यद अली शहा गिलानी यांच्या मृत्यूनंतर जवाहिरीने सांत्वनपर संदेश पाठवला होता. कर्नाटकमधील हिजाब वादाच्या वेळीही त्याने भारतातील मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न केला होता. आता जवाहिरी ढगात गेला असला, तरी अल कायदा ही संपूर्ण नष्ट झालेली नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्याच्या उत्तराधिकाऱ्याची निवड झाली असून, या संघटनेला कायमचे गाडून टाकणे, हे जगासमोरील आव्हान आहे.