प्रभात वृतसेवा पुणे, दि. 4 – महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाने शहरातील सदस्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतल्याने तीनची प्रभाग रचना बदलणार, हे कागदावर निश्चित असले तरी, या निर्णयावरून न्यायालयात दावे दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी लगेच हुरळून जाऊ नये. निवडणूक आयोगाची भूमिका आल्यानंतर पुढील सूचना दिल्या जातील. त्यामुळे जरा सबुरीने घ्या, असा सल्ला पक्ष श्रेष्ठींकडून सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांना दिला जात आहे. या निर्णयामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असून, अनेकांनी दिवसभरात आपल्या नेत्यांकडे तसेच वरिष्ठांचा सल्ला घेतला आहे. राष्ट्रवादीनेही आपल्या इच्छुकांना घाबरू नका. न्यायालयात हा निर्णय टिकेल, असे सांगत धीर देण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्यात, पुण्यासह राज्यातील प्रमुख 14 महापालिकांचाही समावेश आहे. या महापालिका निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने देत 11 मार्च रोजी प्रभाग रचनेची असलेली स्थिती गृहीत धरावी, असे आदेशही दिले आहेत. 11 मार्चपर्यंत महापालिकेची तीन सदस्यांनुसार अंतिम प्रभाग, त्यावरील हरकती पूर्ण होऊन 9 मार्च रोजीच हा अहवाल निवडणूक आयोगास सादर केला होता.
त्यानंतर पालिकेने एसटी आणि एससीच्या प्रभागांचे तसेच खुल्या गटातील महिला आरक्षण काढले होते. मात्र, जुलै महिन्यात पुन्हा ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने अद्याप जिथे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नाही, तिथे ओबीसी आरक्षण द्यावे, असे आदेश दिले. त्यानुसार 29 जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली. आज हे आरक्षण अंतिम म्हणून जाहीर केले जाणार होते. मात्र त्याच्या एक दिवस आधीच शासनाने सदस्यांची संख्या बदलण्याचा निर्णय घेतला. परिणामी नव्याने प्रभाग रचना होणार आहे.
तीनच्या प्रभागात तिकिटासाठी अडचण झालेल्या भाजपच्या इच्छुकांनी जल्लोषच सुरू केला आहे. पुन्हा प्रभाग रचना होणार असल्याने प्रभागात चार सदस्य असतील. त्यात, विद्यमान सदस्य असल्याने तिकीटाला प्राधान्य मिळणार असल्याने इच्छुकांनी प्रभागात रातोरात फ्ल्केस लावत दावा ठोकला आहे. तसेच वरिष्ठांना गाठत या निर्णयाचे काय होईल, कोर्टात तो टिकेल का, पुन्हा चारचा प्रभाग होईल का, अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आहे. त्यामुळे त्यांना तूर्तास काहीच सांगता येणार नाही. तुम्ही तयारी चालू ठेवा तसेच जरा सबुरीने घ्या, असा सल्ला दिला जात आहे.
रातोरात फ्लेक्सची गर्दी
प्रभाग रचना बदलणार असल्याचे समजताच अनेक इच्छुकांच्या प्रभागात रातोरात फ्लेक्सची गर्दी वाढली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच आधीच तीनचा प्रभाग, त्यात पुन्हा ओबीसी आरक्षण आणि प्रभागात दोन महिला असल्याने अनेक इच्छुकांनी आपल पत्ता कट झाल्याने सोशल मीडियावर पत्नीच्या प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर दोनच दिवसांत चारच्या प्रभागाचा निर्णय आल्याने पुन्हा सर्व प्रक्रिया नव्याने झाल्यास आपली संधी कायम राहणार असल्याचे लक्षात येताच अनेकांनी पुन्हा पत्नीचे फोटो काढून टाकत स्वत:च्या नावाची दावेदारी असलेल्या पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आहे.