पाटणा, दि. 1 -देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. कॉंग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व प्रादेशिक पक्षही संपतील. देशात केवळ भाजप राहील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी केला.
बिहारमधील पाटणा येथून त्यांच्या हस्ते भाजपच्या जिल्हा पक्ष कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी बिहारमधील राजदसह अन्य प्रादेशिक पक्षांवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी सर्व प्रादेशिक पक्षही संपतील. देशात फक्त भाजप राहील असा दावा केला असून कोणताही पक्ष भाजपला मात देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
बिहारमध्ये आम्ही राजदशी लढतो आहोत, तो एका कुटुंबाचा पक्ष आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी हादेखील कौटुंबिक पक्ष आहे. ओडिशात नवीन बाबू यांचा पक्ष हा एका व्यक्तीचा पक्ष आहे. महाराष्ट्रात समाप्तीच्या मार्गावर असलेली शिवसेनादेखील एका कुटुंबाचा पक्ष आहे. अशाच प्रकारे कॉंग्रेस बहीण-भावाचा पक्ष बनला आहे, अशी टीका त्यांनी केली.
या सोहळ्यावरून भाजपचे सामर्थ्य कसे वाढत आहे, हे लक्षात येते. भाजप सामान्य जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे. कॉंग्रेसवर टीका करताना ज्यांच्याकडे विचार नाहीत ते एकतर संपले किंवा संपतील. आम्हाला वैचारिक पार्श्वभूमी आहे. आमच्याकडे विचार नसते तर आम्ही एवढी मोठी लढाई लढूच शकलो नसतो. विचार नसलेले लोक संपले. जे अद्याप संपले नाहीत, तेदेखील संपतील. राहील तो फक्त भाजप, असा दावादेखील त्यांनी केला.