कोलकता – कोट्यवधींच्या शिक्षक भरती घोटाळ्यामुळे पश्चिम बंगाल सरकार आणि सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसच्या प्रतिमांना मोठे तडे गेले. आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी मंत्रिमंडळाबरोबरच पक्ष संघटनेत व्यापक फेरबदल करणार असल्याचे समजते.
संबंधित घोटाळ्याबद्दल नुकतीच ममतांचे निकटवर्तीय पार्थ चॅटर्जी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची मंत्रिपदावरून आणि पक्षाच्या पदांवरून हकालपट्टी करण्यात आली. केवळ पक्षातच नव्हे; तर सरकारमध्येही ममतांनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे त्यांची अटक सरकारची आणि पक्षाची मोठी नाचक्की करणारी घडामोड ठरली.
चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय महिलेच्या दोन फ्लॅटमधून तब्बल 50 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. त्या प्रचंड जप्तीमुळे सरकारची आणि पक्षाची आणखीच गोची झाली आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ममता सरकार आणि तृणमूलची कोंडी करण्याची संधी विरोधकांना प्राप्त झाली आहे. आता गेलेली पत परत मिळवण्याच्या उद्देशातून ममतांना ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत. त्यासाठी त्या सरकारचा आणि पक्षाचा चेहरामोहरा बदलवतील, असे संकेत मिळत आहेत.