नागरिकांचा जीव मुठीत; लोकप्रतिनिधी, प्रशासन निद्रिस्तच
राजगुरूनगर – भीमा नदीकाठावर असलेल्या पाभे गावाला पुरापासून मोठा धोका आहे. दरवर्षी पाणी गावातील घरांपर्यंत येते. त्यामुळे नदीचे पूर पात्र वाढत आहे. या गावाला संरक्षक भिंत बसविण्याची गेली अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र, शासनाकडून नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने आणि त्यासाठी निधी मिळत नसल्याने नदी कडेच्या घरांना धोका निर्माण झाला आहे.
खेड तालुक्यातील पश्चिम भागात भीमा नदीच्या कडेला सुमारे 200 वर्षांपासून पाभे गाव वसले आहे. भीमा नदीच्या काठावर हे गाव असल्याने दरवर्षी या गावाला अतिवृष्टीच्या वेळी पुराचे पाणी गावात घुसण्याची भीती निर्माण होते. पुरामुळे भीमानदीचे पात्र वाढले ते गावातील घरापर्यंत जाते. मागील दोन वर्षांपूर्वी भीमा नदीला पूर आल्याने नागरिकांच्या घराजवळील माती दगड वाहून गेल्याने घरांना धोका निर्माण झाला आहे.
आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधित प्रशासन यांच्याकडे पाभे गावाबाबत पूर परिस्थितीची इतंभूत माहिती असताना याबाबत कोणताच निर्णय होत नाही, पाभे ग्रामस्थांकडून अनेकदा संरक्षक भिंत बांधण्याची मागणी करूनही ती बांधली जात नाही नव्हे त्यासाठी निधीची तरतूद केली जात नाही. लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देत असल्याने पावसाळा आला की पाभे गावाच्या नदीकाठच्या घरातील नागरीकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे.
नदीच्या बाजूकडून संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी स्व. शशिकांत जफरे आदिवासी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसन जफरे, ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती जफरे गुरुजी, पोलीस पाटील संदीप कोकाटे, दुलाजी मराडे, ठकसेन मराडे, सखाराम कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य संतोष मराडे, कांताराम मराडे, चिंधू मराडे, हनुमंत मराडे, अंकुश नांगरे, शिवाजी घोडे, शंकर मराडे यांच्यासह पाभे ग्रामस्थांनी केली आहे.
नदीकाठच्या घरांना धोका
खेडच्या पश्चिम भागात गेली आठ दिवस मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. जादा अतिवृष्टी झल्यास पुराचे पाणी गावात घुसण्याची भीती आहे, तर पुराचे पाणी गावाच्या जवळ आल्याने घराजवळील माती दगड खचू लागल्याने घरांना मोठी हानी पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे. घराजवळील भराव पुरात वाहून गेल्याने गावातील नदीकाठच्या घरांना धोका निर्माण झाला आहे.