मुंबई – देशात प्रथमच जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी रूपाने “झिजीया कर’ लावून, सामान्यांना लुटण्याचे कुकर्म मोदी-शहांचे केंद्र सरकार करत आहे. देशातील महागाई मुळात प्रचंड प्रमाणात वाढत असताना जीवनावश्यक वस्तूंवर “जीएसटी’ लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील व्यापारी, दुकानदार रस्त्यावर उतरले आहेत. या त्यांच्या संघर्षात राज्यातील कॉंग्रेस त्यांच्यासोबत असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
नाना पटोले म्हणाले, देशात मुळात महागाई वाढत आहे, त्यात पुन्हा बेरोजगारी दर वाढत असल्याने जनता त्रस्त आहे. भाजप सरकारने पेट्रोल- डिझेल एक्साईज कर मुळात कीत्येक पटीने वाढवले असून, जनतेची लुट चालू आहे.. पुन्हा घरगुती गॅस दरवाढ चालूच असून, विज दर देखील राज्यातील “अतिरेकी भाजप सरकार’ने वाढवले आहेत. त्यामुळे गरीब – मध्यमवर्गीयांचे आर्थिक बजेट कोलमडते आहे.
केंद्र सरकार परकीय वस्तू, उत्पादनांना “रेड कार्पेट’ टाकत असून, देशात आयात प्रचंड वाढत आहे. त्या तुलनेत निर्यात कमी होत आहे. बॅंकांचे कोट्यवधींचे घोटाळे पुढे येत असून, देशाचा पैसा व संपत्ती घेऊन पसार झालेल्यांना केंद्र सरकार अद्यापही पकडू वा आणू शकलेली नाही.
परिणामी, देशाची आर्थिक स्थिती कोलमडत असल्यामुळे अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी केंद्र सरकार आता सामान्यांच्या जीवावर उठले असून, जीवनावश्यक अन्नधान्य-वस्तुंवरील 5% दिसणारा जीएसटी अंमलबजावणीत नागरीकांपर्यंत पोहोचतांना 8-10 % पर्यंतची झळ सर्व सामान्यांना पोहोचणार आहे. या तुघलकी जीएसटी आकारणीचा “तिव्र निषेध’ करत असल्याचे त्यांनी सांगितले.