नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
परिंचे – नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसाने वीर (ता. पुरंदर) धरणातून शुक्रवारी दुपारी दोन वाजता नीरा नदी पात्रात 4 हजार 418 क्युसेक पाणी सोडण्यात आले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे सहायक अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले.
धरणातील सांडव्याचा एक दरवाजा चार फुटांनी उचलून नदीपात्रात 4418 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी 1400 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. डाव्या कालव्यातून 300 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. नीरा नदी पात्रात एकूण 6118 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
नीरा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असाच राहिल्यास रात्री केव्हाही विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रीक उपस्थित होते. पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात किंवा काठावर कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकूण 11 हजार क्युसेक आवक
नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. भाटघर धरणात 48 टक्के पाणीसाठा झाला आहे. नीरा देवघर धरणात 41 टक्के पाणीसाठा झाला आहे. गुंजवणी धरणात 68 टक्के पाणीसाठा झाला आहे. वीर धरण 91 टक्के भरले असून धरणातून 6118 क्युसेक पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी धरणे पूर्ण क्षमतेने भरली नसल्याने या धरणातून पाण्याची आवक होत नाही. नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातून तसेच कानंदी नदीमधून वीर धरणात पाण्याची आवक होत आहे. एकूण 11 हजार क्युसेक पाणी वीर धरणात येत आहे.