मुंबई – लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद पदावरून भावना गवळी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. आता त्याजागी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहिले आहे. संजय राऊत म्हणाले की, लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोदपदी असलेल्या भावना गवळी यांच्या जागी खासदार राजन विचारे यांची तातडीने नियुक्ती करत आहोत, असे त्यांनी प्रल्हाद जोशी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं. या पत्रानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी पत्र लिहून शिंदेंना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे भावना गवळींसह 12 खासदार फुटण्याची शक्यता आहे. म्हणूनच शिवसेनेने भावना गवळी यांना प्रतोदपदावरून हटविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. अशातच व्हायरल झालेल्या पत्राबाबत आणि या सम्पूर्ण प्रकरणावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
संजय राऊत म्हणाले,’भावना गवळी उत्तम काम करत होत्या. पण त्यांच्या काही कायदेशीर लढायांमुळे त्यांना दिल्लीत संसदेत उपस्थित राहाता येत नाही असं अनेकदा दिसलं. अशा वेळी तिथे संसदेत मुख्य प्रतोद म्हणून व्यक्ती उपस्थित राहाणं आवश्यक असतं. काही आदेश काढायचे असतात, काही व्हीप काढायचे असतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सगळ्यांशी बोलून हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी झाली आहे’ असं म्हणत राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, भावना गवळी यांच्यावरही सध्या ईडीची चौकशी लागली आहे. त्यांचा सहकारी सईद खान हा नुकताच ईडीच्या कोठडीतून जामिनावर सुटला आहे. त्यामुळे येत्या काळात भावना गवळीही ईडीच्या रडारवर अडकण्याची शक्यता आहे. त्यातच, एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड योग्य असल्याचे भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेने केलेल्या या कारवाईनंतर भावना गवळी या कोणती भूमिका हे पाहावे लागणार आहे.