बर्मिंगहॅम – चेतेश्वर पुजारा व ऋषभ पंत यांनी फटकावलेल्या अर्धशतकानंतरही अन्य फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारताचा दुसरा डाव 245 धावांवर संपला. मात्र, पहिल्या डावातील 132 धावांच्या मोठ्या आघाडीमुळे हा सामना जिंकण्यासाठी यजमान इंग्लंडसमोर 378 धावा करण्याचे आव्हान आहे.
सोमवारी चौथ्या दिवशी भारताने आपला दुसरा डाव 3 बाद 125 धावांपासून पुढे सुरू केला. यावेळी वेगाने धावा जमवत आघाडी वाढवण्याची गरज होती. त्याच प्रयत्नात अर्धशतकवीर चेतेश्वर पुजारा 66 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने आक्रमक फटकेबाजी करण्याचे धोरण अवलंबिले, तर दुसऱ्या बाजूने ऋषभ पंतनेही गोलंदाजांवर हल्ला चढवला. या दोघांनी संघाची आघाडी त्रिशतकी धावांपर्यंत वाढवली.
पहिल्या डावात दमदार शतकी खेळी करणाऱ्या पंतने या डावातही आक्रमक अर्धशतकी खेळी केली. त्याने 86 चेंडूत 8 चौकारांसह 57 धावा केल्या. त्यानंतर मात्र तो लगेचच बाद झाला. अय्यरही 19 धावा करून परतला. त्यानंतर शार्दुल ठाकूरनेही निराशा केली. मात्र, त्यावेळी पहिल्या डावातील दुसरा शतकवीर रवींद्र जडेजाने संघाच्या द्विशतकी धावा फलकावर लावल्या. त्यानंतर जडेजाने महंमद शमीच्या साथीत धावा वाढवण्याचा प्रयत्न केला.
त्याचवेळी इंग्लंडचा कर्णधार व अष्टपैलू बेन स्टोक्सने चार फलंदाज बाद करत भारताचा डाव 245 धावांवर संपुष्टात आला. जडेजाने उपयुक्त 23 धावांची खेळी केली. भारताने पहिल्या डावातील 132 धावांच्या आघाडीसह यजमान इंग्लंडसमोर विजयासाठी 378 धावांचे आव्हान ठेवले.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – 416. इंग्लंड पहिला डाव – 284 धावा. भारत दुसरा डाव – 81.5 षटकांत सर्वबाद 245 धावा. (चेतेश्वर पुजारा 66, ऋषभ पंत 57, रवींद्र जडेजा 23, विराट कोहली 20, श्रेयस अय्यर 19, महंमद शमी 13, बेन स्टोक्स 4-33, स्टुअर्ट ब्रॉड 2-58, मॅटी पॉट्स 2-50, जॅक लिच 1-28, जेम्स अँडरसन 1-46).