मुंबई – शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल पण आता माघार घ्यायची नाही, असे मी ठरवूनच पावले उचलत होतो. कारण हा काही एका दिवसाचा कार्यक्रम नाही. माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू होता, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.
शिंदे सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यावर विविध पक्षाच्या नेत्यांनी भाषणे केली. त्याला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. शिवसेनेत बंडाचा झंडा का फडकावला, याचे त्यांनी कारण स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब नेहमी सांगायचे की, अन्यायाविरोधात बंड असेल, उठाव असेल तरी केला पाहिजे. माझे फोन फिरू लागले आणि धडाधड लोक जमू लागलो. मंत्रीपद आणि आमदारकी पणाला लावून हे सर्व माझ्यासोबत आले. त्यांचे आभार मानतो. पण शिवसेना वाचवण्यासाठी लढून शहीद झालो तरी चालेल पण माघार नाही, असा निर्धार केला. तुमचे नुकसान होईल असे जेव्हा वाटेल, तेव्हा तुमचे भविष्य सुरक्षित करून निघून जाईन, असे मी या आमदारांना सांगितले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या दोन मुलांचा अपघाती मृत्यू झाला. ती घटना आणि शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी दिलेले पाठबळ याची आठवण सांगताना एकनाथ शिंदे भावूक झाले. समाजासाठी उभे राहावे लागले, असे आनंद दिघे म्हणाले. त्यानुसार मी पुन्हा उभा राहिलो.
सर्व प्रकल्प मार्गी लावू
राज्यातील सर्व लोकांना न्याय देण्याचे सरकार, सर्वांगिण विकास करणारे सरकार तसेच जे काही मेट्रो प्रकल्प, समृद्धी हायवे असतील. ते सर्व प्रकल्प आपण मार्गी लावू आणि राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाऊ. केंद्राची मदत घेऊन राज्य सुजलाम सुफलाम करू. मला वाटते सर्वांनी मिळून आपण हे सर्व स्वीकारले पाहिजे.
शेवटी लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असते. त्यामुळे तुम्ही हे स्वीकारले पाहिजे की, हे बहुमताचे सरकार आहे. त्यामुळे आमच्याकडून चुकीचे कधीही-काहीही होणार नाही. एवढी आपल्याला मी खात्री देतो, असेही शिंदे म्हणाले.
सगळ्यात मोठे कलाकार फडणवीस-शिंदे
राज्यातील सत्तासंघर्षाच्या अभूतपूर्व नाट्यानंतर नवे सरकार स्थापन झाले. त्या नाट्यावरील पडदा प्रथमच हटवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निभावलेल्या सक्रिय भूमिकेविषयी भाष्य केले. सगळ्यात मोठे कलाकार फडणवीस असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्या बंडामागे भाजप असल्याचा आरोप आघाडीकडून वारंवार करण्यात आला. मात्र, बंडाशी काही देणे-घेणे नसल्याची भूमिका भाजपने सातत्याने घेतली. बंडखोर आमदार गुवाहाटीत मुक्कामी असताना शिंदे यांनी गुपचूपपणे गुजरातमध्ये फडणवीस यांची भेट घेतल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी वाहिन्यांनी दिले.
मात्र, त्या वृत्ताला पुष्टी मिळू शकली नव्हती. अखेर शिंदे यांनी विधानसभेत बोलताना दडून राहिलेल्या काही घडामोडी उघड केल्या. मी आणि फडणवीस कधी भेटायचो ते आमच्या आमदारांनाही माहीत नव्हते. ते सगळे झोपल्यानंतर आमची भेट व्हायची. ते उठण्याआधी मी परतायचो. सगळे ज्यांनी घडवले ते येथे आहेत, असे म्हणत शिंदे यांनी फडणवीस यांच्याकडे अंगुलिनिर्देश केला.
शिंदे यांच्या त्या गौप्यस्फोटानंतर फडणवीस यांनी दोन्ही हातांनी स्वत:चा चेहरा झाकून घेतला. तसेच, सगळं उघड करू नका, असा सल्लाही फडणवीस यांनी गंमतीने शिंदे यांना दिला.