महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. यादरम्यान आधी विधानसभा अध्यक्षांची निवड होईल, त्यानंतर एकनाथ शिंदे सरकारला बहुमत चाचणी द्यावी लागणार आहे. हे अधिवेशन चांगलेच गदारोळाचे होण्याची शक्यता आहे. यादरम्यान पहिल्यांदाच ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या या विशेष अधिवेशनात रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने प्रथमच तरुण आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने राजन साळवी यांना पुढे केले आहे.महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे गटाने भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केलं.
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेत शिवसेनेचे 55 पैकी 39 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. याशिवाय 9 अपक्ष आणि इतर 2 पक्षांचे आमदारही त्यांना पाठिंबा देत आहेत. नव्या सरकारमध्ये मित्रपक्ष भाजपचे 105 आमदार आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांच्या विजयासाठी भाजप जोरदार शक्तिप्रदर्शन करेल.
गेल्या वर्षी काँग्रेसचे नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे. आतापर्यंत उपसभापती नरहरी झिरवाळ सभागृहाचे कामकाज सांभाळत होते, मात्र शिवसेनेत बंडखोरी सुरू असताना त्यांच्या निर्णयांवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या अधिवेशनासाठी मागील उद्धव सरकारविरोधात बंडखोरी करणारे बंडखोर आमदार शनिवारी रात्री गोव्याहून मुंबईत पोहोचले आहेत. या आमदारांची आणि एकनाथ शिंदेसहदेवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री बैठकही झाली.
अधिवेशनादरम्यान नेमका कोणाचा व्हीप चालणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. कारण बंडखोर आमदारांनी देखील या लढतीसाठी जोरदार तयारी केली आहे. एकंदरीतच विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत उघडपणे समोर येऊ शकते. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील या युद्धाचा सभापतीपदाच्या निवडणुकीवर काय परिणाम होतो, हे पाहणे बाकी आहे.