मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाने शिवसेनेसह महाविकास आघाडीलाही हादरवून सोडलं आहे. शिंदेंच्या गोटात आंमदारांची वाढती संख्या पाहता उद्धव ठाकरे यांनी कालच मुख्यमंत्रीपदाच्या राजीनामा देण्यास तयार असल्याचे सांगितले होते. तसेच रात्री उशिरा त्यांनी शासकीय निवासस्थान वर्षा सोडत ते पुन्हा मातोश्रीवर गेले. अशातच आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजीनाम्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. ठाकरे हे आज मंत्रालयातील सर्व सचिवांचे आभार मानणार आहेत. ठाकरे यांचे हे पाऊल त्यांच्या राजीनाम्याच्या दिशेने उचललं असल्याचं बोललं जातंय.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधताना बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली होती. मात्र बंडखोरांचे मत परिवर्तन होण्याऐवजी मुंबईत असलेले काही सेना आमदार शिंदेच्या गटात गेल्याचं पाहायला मिळालं. शिंदे यांच्या गटात सध्या सेनेचे जवळपास ४० आमदार असल्याची माहिती आहे. पक्षाबंदी कायद्यांतर्गत कारवाई टाळायची असल्यास शिंदे गटाला ३७ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. सेनेचे केवळ आमदारच नाही तर खासदार देखील फुटले असून १८ पैकी ९ खासदार सध्या शिंदेंच्या गळाला लागल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री वर्षा निवासस्थान सोडताना शिवसैनिक मोठ्या संख्येने उस्फुर्तपणे रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं होत. ठाकरे यांनी यावेळी रस्त्यावर उतरून शिवसैनिकांचे प्रेम स्वीकारले होते. यावेळी बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचंही पाहायला मिळालं.
उद्धव ठाकरेंची भावनिक साद, मुंबईच्या रस्त्याववर शिवसैनिकांचे विराट शक्तिप्रदर्शन या नंतरही बंडखोर आमदार मात्र आपल्या मागण्यांवर कायम आहेत. शिंदे गटाने ठाकरे यांना यापूर्वीच सेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अशी सूचना केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे मात्र यासाठी तयार नसल्याचं दिसत आहे.
अशातच भाजपने आता शिंदे गटाला मोठी ऑफर दिल्याची माहिती समोर आली असून शिंदे गटाला केंद्रात व राज्यात सत्तेत वाटा देण्यात येईल असं सांगण्यात आलंय.